नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेने जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करत २३ मे २०२५ (शुक्रवार) रोजी मुख्यालय अंतर्गत बदल्यांचे आदेश निर्गमित केले. या प्रक्रियेत एकूण ३५ कर्मचाऱ्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली असून, यामध्ये २७ कनिष्ठ सहाय्यक आणि ८ वरिष्ठ सहाय्यकांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि कामकाजात गतिमानता निर्माण करण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकाच विभागात सलग ५ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेले कर्मचारी यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे. बदल्यांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले असून, सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
यानंतर ३१ मे पर्यंत एकाच विभागात एकाच टेबलवर ३ वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संकलन बदलण्याच्या सूचना देखील मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. १४ व १५ मे रोजीच्या बदली प्रक्रियेनंतर मुख्यालय स्तरावरील बदली प्रक्रियेचा हा शेवटचा टप्पा देखील पूर्ण झाल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.