नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नाशिक विभागात अवलस्थान मिळविले आहे. त्याअंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार भारतीय गुणवत्ता प्राधिकरणाने (QCI) देखील नुकतेच कार्यालयाची पाहणी केली आहे. राज्यस्तरावरील निकाल दिनांक २३ मे रोजी जाहीर होणार आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयाकडे जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ या कालावधीत सुमारे १०५१६ प्रकरणे प्राप्त झाली होती, त्यातील सुमारे ९३२७ प्रकरणांवर समितीने जलद गतीने निर्णय घेऊन अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरित केले आहे. तसेच तुटी पूर्तताकामी प्रलंबित असलेल्या ७४९ प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी समितीने माहे जानेवारी, फेब्रुवारी ,मार्च व एप्रिल महिन्यात विशेष तुटी पूर्तताकामी शिबिराचे देखील आयोजन केले होते. त्याचप्रमाणे १५६ अर्जदारांच्या विनंतीनुसार तातडीने सुनावणी देखील माहे जानेवारी, फेब्रुवारी, व एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या आहेत व त्या प्रकरणावर निर्णय होऊन देखील जात पडताळणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहे.
ही सर्व प्रक्रिया सुरळीत व जलद गतीने होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ५२७ महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांची माहे जानेवारी व एप्रिल महिन्यात दोन टप्प्यांमध्ये ऑनलाईन वेबिणार आयोजित करण्यात आला होता, यामध्ये समितीचे अध्यक्ष, उपायुक्त, संशोधन अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी याबाबत विशेष सूचना निर्गमित केल्या होत्या. तसेच दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय नाशिक येथे ऑनलाईन प्रणालीनुसार मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्याचा ३०० अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी श्री.जलज शर्मा यांच्या हस्ते देखील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत.
शासनाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष अंतर्गत समितीने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.समाज कल्याण विभागाने देखील जात प्रमाणपत्र समितीचे मूल्यांकन केले असून नाशिक विभागातील सर्व समित्यांमध्ये नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवलस्थान मिळवले आहे.