अनोखा दुर्गाविष्कार – हरिहर
नाशिकमधून नियमितपणे भटकणार्यांना त्र्यंबकेश्वराची डोंगररांग सगळ्यात जवळची. त्र्यंबक भागात ट्रेक करतांना विविध ॠतूत दरवेळी निरनिराळं निसर्गरूप अनुभवायला मिळतं. दिवसाभरात अटोपशीर भटकंती करून परतायचं तर अंजनेरी व ब्रह्मगिरीनंतर येतो तो ‘हरिहर’. फक्त नाशिककरच नव्हे तर संपूर्ण राज्य आणि देशातून गिर्यारोहक मंडळींमध्ये हरिहर हे नाव खूप प्रसिद्ध आहे.

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
त्र्यंबक, भास्करगड आणि हरिहर या तिन्ही दुर्गांवर असलेल्या कातळातल्या खोदीव पायर्यांवरून त्यांची निर्मिती समकालीन असल्याचा तर्क लावता येतो. हे तिनही किल्ले बनण्यास सुमारे ८०० वर्षांहून अधिक काळ लोटलेला दिसून येतो. त्रिंबक किल्ल्याचा उल्लेख थेट यादवकाळापासून वाचनात येतो. इ.स. १६२६ मध्ये शहाजीराजांनी माहुली किल्ल्याला शरणागती पत्करतांना मुघल सरदार खानजमानला त्रिंबक आणि त्रिंगलवाडीबरोबर हरिहर दुर्ग दिल्याचा उल्लेख आहे. इ.स. १६८८ मध्ये औरंगजेबाचा सरदार मातबरखानाच्या पत्रातही हरिहरचा उल्लेख मिळतो. इ.स. १८१८ मध्ये इतर सर्व किल्ल्यांबरोबरच हरिहरही इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला. इतिहासाचे अनेक धागेदोरे हरिहराने आपल्या पोटात राखून ठेवलेले दिसतात.
हरिहरच्या पायथ्याला दोन गावे आहेत. उत्तरेला हर्षवाडी तर दक्षिणेला निरगुडपाडा. पायथ्याच्या या गावांना पोहोचायचं तर नाशिकहून पहिलं त्रिंबकेश्वर गाठायचं. त्रिंबकहून दोन रस्ते हरिहरकडे जातात. त्रिंबक – पेगलवाडी, पहिने, सामुंडी, टाकेहर्ष आणि निरगुडपाडा हा एक रस्ता. तर त्रिंबक – सापगाव – काचुर्ली, लेकुरवाळी आणि हर्षवाडी. पूर्वी हर्षवाडी गावापर्यंत गाडीरस्ता नव्हता तेव्हा सर्व गिर्यारोहक निरगुडपाडा येथून चढाई करत असत. परंतु पलिकडचे हर्षवाडी गाव रस्त्यांनी जोडले गेले. त्रिंबकपासून जरा कमी अंतरावर आणि निरगुडपाड्यापेक्षा कमी चढाई असल्याने आता हर्षवाडी हाच मुख्य पायथा बनलाय.

अगदी ३०-३२ घरं असलेल्या हर्षवाडीतून वर जाणारी वाट कुणीही दाखवतं. पायवाट चांगली मळलेली आहे. हरिहरच्या पोटातलं जंगल तसं दाट आहे परंतु हळूहळू त्यालाही धक्का बसतोय. रमतगमत चढायचं. समुद्रसपाटीपासून हरिहरची उंची ११२० मीटर इतकी आहे. परंतु पायथ्यापासून एवढा उंच नाही. चढाई सोपी असली तरी थोडा दम लागतोच म्हणून थोडं थांबून आरामही करून घ्यायचा. मधल्या टप्प्यावरील सपाटशा जागेवरून पुन्हा वर जात आपल्याला एका जागेवर शेंदूर लावलेले अनेक दगड दिसतात. हा ‘वेताळ पायथा’ म्हणून ओळखला जातो.
इथे हल्ली स्थानिकांनी तात्पुरत्या झोपड्या उभारून चहा, पाणी, सरबताचे हॉटेल्स थाटली आहेत. या वेताळाजवळ तरूण मंडळी जोरबैठकाही काढतात, कारण अशी तिथे प्रथा आहे. या वेताळाशी आलं की, श्रावणात केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रदक्षिणेचं बरोबर निम्म अंतर संपतं. पुन्हा थोड्या उंचवट्यातून जात आपण हरिहरच्या एकदम उभ्या कातळाजवळ जाऊन पोहोचतो. गडाच्या नैऋत्येला असलेल्या या कड्याचं नांव आहे ‘स्कॉटीश कडा’.

डगलस स्कॉट या ब्रिटीश गिर्यारोहकाने १९८५ साली हा कडा सर केला होता. त्यावरून पडलेलं या कड्याचं नांव. या कड्याच्या थोडं उजवीकडे बळसा घेतला की कातळावर सलग वर पर्यंत कोरलेल्या पायर्यांचा सरळसोट जिना दिसतो. हा सगळा एकदम अंगावर आलेला मार्ग पाहून आपण रोमांचित होतो. तशा या पायर्या चढायला फारशा अवघड नाहीत. हाताला धरण्यासाठी खोबण्याही बनवलेल्या आहेत. झपझप पालीसारखं वर चढायचं. हरिहरला यायचं तर या जिन्यावरून चढण्यातलं थ्रील अनुभवायलाच!
साधारण ९०-९५ पायर्या चढल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. अजूनही चांगल्या अवस्थेत असलेलं हे प्रवेशद्वार बघून कातळातल्या कोरीव मार्गानेच थोडं वर जात गडमाथ्यावर पाऊल ठेवायचं. गडमाथ्यावर मनसोक्त हिंडायचं. काही पाण्याची टाकी आणि तलावही लागतो. पाण्याच्या तलावा शेजारी हनुमान आणि शंकराचं ठिकाणही आहे.
तलावाशेजारून पुढे जात एका उंचवट्यासारखा टेकडीवर हरिहरचा सर्वोच्च शेंडा लांबूनच दिसतो. तिथं पोहोचायचं. ह्या शेंड्यावर झेंडा लावलेला आहे. आपण ज्या गावातून चालत आलो तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आपण तिथून आलो ! असं आश्चर्यभाव आपोआपच येतो. ब्रह्मगिरी, ब्रह्माडोंगर, बसगड, फणीचा डोंगर, उतवड, वैतरणा जलाशयाचं अथांग पाणी असा सगळा नजारा मनात साठवून ठेवायचा. हरिहरच्या माथ्याच्या पाठीमागच्या भागावर एक कोठारासारखी इमारत दिसते.









