पुणे – गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे-नाशिक हा प्रवास आता अतिशय सुसाट वेगाने होणार आहे. नाशिक-पुणे या महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित होते. गेल्या काही वर्षात ते सुरू होते. नाशिक ते सिन्नर, सिन्नर ते संगमनेर, संगमनेर ते नारायणगाव, नारायणगाव ते चाकण अशा विविध टप्प्यांमध्ये ते सुरू होते. संगमनेर आणि सिन्नर बायपास मार्गी लागल्यानंतरही नारायणगावचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर तो आता संपुष्टात आला असून नारायणगाव बायपास वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. आणि याच बायपासचे फोटो खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे नागरिकांना उपलब्ध करुन दिले आहेत. या महामार्गामुळे नाशिक आणि पुणे ही दोन्ही शहरे आणखी एकमेकाच्या जवळ येणार आहेत. शिवाय उद्योग, व्यवसाय, पर्यटन अशा विविध क्षेत्रांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.