नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिस अकादमीतील चतुर्थश्रेणी कर्मचा-याला दोन लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहन कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवित या भामट्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रविंद्र मोतिराम साळवे (रा.एमपीए,त्र्यंबकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन इशानी यादव, प्रशांत उत्तेकर, प्रियंका सिंग, रंजना पुरे, राजेश मिश्रा, अमित शहा, अंकिता शर्मा व अन्य एक मोबाईल धारक अशी गंडा घालणा-या संशयितांची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळवे महाराष्ट्र पोलिस अकादमीतील चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. गेल्या मे महिन्यात साळवे यांच्याशी भामट्यांनी संपर्क साधला होता. टाटा कॅपीटल लि.परेल,मुंबई या फायनान्स कंपनीकडून साडे तीन लाख रूपयांचे वाहन तारण कर्ज मिळवून देण्याचे त्यांना आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे साळवे यांनी आपली कागदपत्र संशयितांना मोबाईल द्वारे पाठविले होते. २० ते २२ दिवसांच्या काळात संशयितांनी बँकेच्या बनावट कागदपत्राच्या आधारे साळवे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भामट्यांनी विमा,अॅग्रीमेंट सिक्युरिटी,आरटीजी चार्ज, सर्व्हीस चार्ज,जीएसटी आदी विविध कारणे सांगून साळवे यांना वेगवेगळया मोबाईल क्रमांकावर तब्बल १ लाख ९३ हजार ९९१ रूपये फोन पे द्वारे अदा करण्यास भाग पाडले. दोन तीन महिने उलटूनही कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा न झाल्याने साळवे यांनी चौकशी केली असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.