नाशिक : पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या दोन घटना सोमवारी घडल्या. पहिल्या घटनेत महिलेने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तर दुस-या घटनेत पाय घसरुन पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी उपनगर आणि पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना वालदेवी नदी किनारी घडली, गौळाणेरोडवरील बापू पांडूरंग हांडगे (रा.कोंबडे मळा,पाथर्डीगाव) हे गेल्या शनिवारी (दि.१३) नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी परिसरातील गेले होते. सायंकाळी जनावरे परतली तरी हांडगे घरी आले नाहीत. त्यामुळे कुटूंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. सोमवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास पिंपळगाव खांब येथील वालदेवी नदीच्या पुलाखाली त्यांचा मृतदेह मिळून आला. पाय घसरून पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात असून याबाबत दिपक हांडगे यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत. दुसरी घटना गोदापात्रावरील रामवाडी पुल भागात घडली. श्रध्दा बाळासाहेब पठारे (२५ रा.उदय कॉलनी,म.बादरोड) या सोमवारी (दि.१५) रात्री रामवाडी पुलाखाली पाण्यावर तरंगतांना आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला. पठारे यांना बेशुध्द अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. पठारे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा असून याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक आनंदा घिसाडी यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार राजपूत करीत आहेत.