नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारावीच्या परिक्षा संपल्यामुळे रामकुंडावर पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रापैकी एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सहर्ष राजेंद्र भालेराव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला १२ वी नंतर वैद्यकिय शिक्षण घ्यायचे होते. मात्र त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले.
सुट्या असल्यामुळे सहर्ष व त्याचा मित्र रामकुंडावर फिरण्यासाठी गेले होते. येथे त्यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. ते गांधीतलावावर पोहण्यासाठी उतरले. पण, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघे जण पाण्यात वाहू लागले. त्यामुळे येथील नागरिकांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, सहर्षचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्याचा उपयोग झाला नाही.
या दुर्दैवी घटनेमुळे कॉलेजसह मित्रा परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर भालेराव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.