नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाल्मिकनगर भागात कुरापत काढून चार जणांच्या टोळक्याने बापलेकीस बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत हातातील लोखंडी कड्याने मारहाण करण्यात आल्याने ५२ वर्षीय इसम जखमी झाला आहे. याप्रकरणी गुलाब दादू जाधव (५२ रा.सैलानीबाबा चौक, वाल्मिकनगर) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविंद्र विठ्ठल पाटील, चेतन रविंद्र पाटील, गोपाल काशिनाथ चौधरी व गणेश दिवे अशी बापलेकीस मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. जाधव व त्यांची मुलगी बुधवारी (दि.१७) आपल्या घरासमोरील ओट्यावर बसलेले असतांना संशयितांनी त्यांना गाठून तुम्ही येथे का राहतात या कारणातून कुरापत काढून वाद घातला.
यावेळी टोळक्याने शिवीगाळ करीत बापलेकीस मारहाण केली. या मारहाणीत जाधव यांना चौघांपैकी एकाने हातातील लोखंडी कड्याने मारहाण केल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.