नाशिक – आषाढी एकादशी निमित्ताने पंचम निषाद तर्फे दरवर्षी “‘बोलावा विठ्ठल” या अभंग संध्येचे आयोजन केले जाते. करोना मुळे संगीतप्रेमींची २०२० आणि आता २०२१ ची वारी चुकली होती. त्या मुळेच या वर्षी कार्तिकी एकादशीचा योग्य साधत भारतातील आठ शहरात “बोलावं विठ्ठल” सादर होत आहे. भारत दौऱ्याचा समारोपणाचा प्रयोग नाशिक येथे येत्या रविवारी दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे सादर होणार आहे.
२००८-९ मध्ये सा रे ग मी पा मराठी लिटल चॅम्प द्वारे घराघरात पोहोचलेले आणि आता त्याच कार्यक्रमाचे परीक्षक बनलेले तरुण पिढीतील तीन दमदार गायक मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि आर्या आंबेकर यांच्या कर्णमधुर स्वरातील भक्तिगीतांचा स्वरसाज अनुभवण्याची संधी नाशिकच्या रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. मराठी मनातील भक्ती आणि श्रद्धेला एकादशीनिमित्ताने येणाऱ्या पुराला भक्तिगीतांचे श्रीफळ अर्पण करण्याच्या भावनेतून या भक्तीगीत संध्येचे आयोजन केले आहे.
तेराव्या शतकापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत जनाबाई यांनी विठ्ठलाला वाहिलेले असंख्य अभंग वेगवेगळ्या पद्धतीने रचले. त्या रचनांमधील भक्तीरस आणि अवीट चाल आणि सुरेल गळ्यांमधून ऐकण्याची अनुभूती हा एक अनोखा अनुभव ठरतो. प्रसाद पाध्ये, सुखद मुंडे, आदित्य ओक, अपूर्व द्रविड, एस आकाश या दमदार सहकलाकारांची साथ प्रमुख गायकांना लाभणार आहे.
पंचम निषादचे संचालक शशी व्यास म्हणाले, या वर्षी पंचम निषाद भारतीय सांगितलं वाहून घेणाऱ्या संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि बोलावं विठ्ठल या कार्यक्रमाचे १६ वे वर्ष आहे. पंचम निषाद च्या पहिल्या कार्यक्रमाची सुरवात आम्ही नाशिकलाच केली होती आणि त्या नंतर नाशिकच्या रसिकांशी आमचे घट्ट ऋणानुबंध जुडले. भक्ती आणि अध्यात्म हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. अभिव्यक्तीची अनेक माध्यमं असतात. संगीतकार आणि श्रोत्यांमध्ये संगीतामुळे एक अनोखे बंध निर्माण होते. हिम्ज, सुफी, कवाली, भजन/अभंगवाणी अशा संगीत प्रकारातून प्रत्येकाला चत्याअत्त्युच्च, अज्ञात शक्तीशी जोडले जाण्याचा आपला मार्ग सापडतो.
अभंग आणि कवितांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि समर्थ रामदासांसारख्या प्रसिद्ध संतांनी मांडलेले जीवनाचे सार, त्याचे तत्व समजून घेणे, त्याचे अर्थ लावणे हे अनेक शतके संशोधकांसाठी काहीसे अवघड काम होते. आज ही आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी मन:शांतीचा शोध घेणाऱ्यांसाठी हे साहित्य म्हणजे दीपस्तंभच आहे.
बोलावा विठ्ठल; हा संतसाहित्याने नटलेला कार्यक्रम आहे. दोन दशकांहून अधिक काळ पंचमनिषाद तर्फे भारतातील या जगविख्यात अप्रतिम लोककलेवर भर दिला जात आहे. यंदा जबलपूर, इंदौर, भोपाळ, मंगळुरु, बंगळुरू, मुंबई, पुणे अशा ७ शहरांत सादरीकरण करून या दौऱ्याची सांगता नाशिक येथे होत आहे. अनेक संतांनी मांडलेले आयुष्याचे सार सांगणारे भारतीय तत्वज्ञान आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा तरुणपिढीपर्यंत नेण्याचा एक प्रयत्न म्हणजे बोलावा विठ्ठल! करोना च्या पार्श्वभूमीवर कालिदास कलामंदिर येथे फक्त ५०% आसनक्षमतेत शासनाचे सर्व नियम पाळत ही भक्ती-संगीताची सुरेल मैफल रंगणार आहे. तिकिट्स कालिदास कलामंदिर येथे तसेच ऑनलाईन बुकमायशो इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नाशिक मध्ये हा कार्यक्रम फ्रेंड्स सर्कलचे जयप्रकाश जातेगांवकर यांच्या सहयोगाने आयोजित केला आहे.