पवारसाहेब व पक्ष माझ्या पाठीशी ; ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही…
मुंबई – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि संपूर्ण मंत्रीमंडळ माझ्या पाठीशी असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिली.माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे तसे आदरणीय पवारसाहेब व पक्ष पाठिशी असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे. सध्या ही लढाई लढण्यासाठी मी एकटा पुरेसा असून ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
माझे कितीही पुतळे जाळा …मी तुम्हाला आरसा दाखवणारच – नवाब मलिक
– माझे कितीही पुतळे जाळा मी तुम्हाला आरसा दाखवणारच… आरसा दाखवल्यावर इतके का घाबरताय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्वीटरवर मला एका जनावराची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नेते नेहमीच प्राण्यांची नावे देत असतात. त्यातून त्यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. भाजपचे नेते माणसाला माणूस समजत नाहीत. माणसाला जनावराची उपमा देणे ही यांची संस्कृती आहे. या उपाधीमुळे आमची इज्जत जात नाही उलट भाजपची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होते असेही नवाब मलिक म्हणाले.
समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय; नवाब मलिक
समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय हे आता सिद्ध होतेय त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. काल गुजरातच्या द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडले आहे. त्याआधी मुंद्रा एअरपोर्टवर तीन टन ड्रग्ज सापडले होते त्याची किंमत २७ हजार कोटी रुपये होती. या ड्रग्जच्या खेळात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी, सुनिल पाटील हे किरीटसिंग राणा यांच्याकडे वारंवार का जात आहेत. हे सगळे गुजरातच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कशासाठी रहात आहेत अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.
मुंद्रा एअरपोर्टवरील ड्रग्ज प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले आहे. आता द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडल्यानंतर एनसीबीची जबाबदारी आहे यातून सत्य बाहेर काढावे. या देशातून अमली पदार्थाचा व्यापार नेस्तनाबूत करण्यासाठी १९८५ मध्ये कायदा करण्यात आला होता त्याची अमलबजावणी करावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. मुंबईत दोन – चार ग्रॅम ड्रग्ज पकडून बॉलिवूडला बदनाम करुन प्रसिद्धी करण्यात येत आहे. समुद्रमार्गे ड्रग्ज येत आहे तेपण गुजरातमध्ये रॅकेट सुरू आहे. हे सगळं मनिष भानुशाली, धवल भानुशाली व त्यांचे इतर सहकारी गुजरातमधून सांभाळत आहेत. त्यामुळे या तपासाचा छडा एनसीबी व एनआयए यांनी लावावा मग यामध्ये कोण कितीही मोठा असो, मंत्री असो किंवा कार्यकर्ता आहे न पहाता ड्रग्जच्या खेळात जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाईअंती शिक्षा झाली पाहिजे अशी अपेक्षा एनसीबी आणि एनआयए यांच्याकडून नवाब मलिक यांनी केली आहे.