नाशिक – मराठा विद्या प्रसारक मंडळाची निवडणूक जवळ येऊन ठेपली असतांना आता आरोप – प्रत्यारोपाला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यात वारसदार सोडून इतर प्रकारे मविप्र सभासद केल्यामुळे त्यावर आक्षेप घेऊन आरोप सुरु आहे. या आरोपाची मविप्र बचाव कृती समितीच्या नावाने एक पोस्ट सध्या व्हायरल होत असून त्यात अनेक प्रश्न उपस्थितीत करण्यात आले आहे.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कार्यकारणीत तसा ठराव झाला आहे का ? सुचक अनुमोदक कोण आहे ? घटनादुरुस्तीत व विशेष सर्वसाधारण सभेत फक्त वारसाचे सभासद करण्याचा अधिकार कार्यकारणी मंडळाला दिलेला आहे त्यासाठीही नियमावली आहे. अशा प्रकारे संस्था कायम ताब्यात ठेवण्यासाठी संस्थेच्या घटनेची पायमल्ली करून कर्मवीरांच्या नावाखाली घरातले सभासद कशाप्रकारे केले. अशाप्रकारे तुम्ही मविप्रला के. के. वाघ सारखी गिळंकृत करण्याचा स्पष्ट प्रयत्न चालवल्याचे दिसत असल्याचे म्हटले आहे. त्यासाठीच तुम्ही वाघ कंपनीला सभासद करून घेतले. समाज असे होऊ देणार नाही असे म्हटले आहे.
त्याचप्रमाणे पंचसूत्री कार्यक्रमही या पोस्टमध्ये जाहीर करण्यात आला आहे. त्यात
१.कार्यकारणी व सरचिटणीस त्यांचे कुटुंबीय यांना गाव बंदी करणे.
२.दहावे मौती लग्न समारंभात आल्यावर त्यांना जाब विचारणे व त्यांच्याशी नातेसंबंध तोडणे सोयरीची तोडणी.
३.कार्यकारणीचा निषेध म्हणून सभासदांनी गावात चौका चौकात बॅनर लावणे.
४.समाजातील उच्च शिक्षित व शेतकरी समाज बांधवांना ही मविप्र संस्थेत सभासद करून घेण्यासाठी मागणी करणे व धर्मदायुक्तांना याबाबत पत्र पाठविणे.
५.संस्थेतील अशा प्रकारे खोटे काम लबाडी व भ्रष्ट काम करणाऱ्यांना (कर्मचारी सुद्धा) ओळखून संस्थेपासून दूर ठेवणे.
असे म्हटले आहे.या पोस्टमध्ये कोणाचेही नाव नाही. कृती समितीत कोण आहे हे सुध्दा दिलेले नाही. या आरोपाबाबत अद्याप संस्थेकडूनही कोणतेचे उत्तर देण्यात आले नाही.