मुंबई – कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईत आता कोरोना नियंत्रणात आला आहे. दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्यासह मुंबईत कोरोना निर्बंध आजपासून शिथिल होत आहेत. मुंबईमध्ये सध्या एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. तसेच राज्यात शनिवारी दिवसभर ९.५२ लाख लोकांचे आणि मुंबईत १.५१ लाख लोकांचे विक्रमी लसीकरण झाल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली.
मुंबईत जिथे हजारोने नवे बाधित निघत होते तिथे आता बाधितांची संख्या झपाट्याने घसरली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार आजपासून मुंबईकरांना लोकलने प्रवास करता येणार आहे. परंतु त्यासाठी संबंधित व्यक्तीने कोरोना प्रतिबंधित लशीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. स्मार्टफोन असणार्यांना मोबाईल अॅपवर रेल्वेचा पास डाउनलोड करावा लागत आहे. स्मार्टफोन नसणाऱ्या प्रवाशांना महापालिकेच्या प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकातून पास घेता येत आहे. या रेल्वे पासवर क्यू आर कोड आहे. त्याद्वारे रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येत आहे. मुंबई आजपासून मॉल, दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोना लाट ओसरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
दोन आनंदाच्या बातम्या:
१. आज रात्री ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ९.५२ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, १.५१ लाख मुंबईकरांचे लसीकरण झाले.
२. आजघडीला मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
पण तरीही, मास्क वापरा, लस घ्या, सुरक्षित रहा!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 14, 2021