मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय त्याचे मोठे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आता ठिकठिकाणी तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची चिन्हे आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. जाहीर सभांमधून राज यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. मात्र, केतकीच्या पोस्टबद्दल राज यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत तिला सुनावले आहे.
केतकी चितळे सातत्याने तिच्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यामुळे समोर येत असते. आता पुन्हा ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल तिने फेसबुकवर पोस्ट टाकली असून, तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्निल नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राज ठाकरे यांनीही केतकीच्या पोस्टवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, केतकीला त्यांनी चांगलेच सुनावले आहे.
राज ठाकरे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. त्यात ते म्हणतात की, कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वैगेरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा! pic.twitter.com/hnngbIwQaW
— Raj Thackeray (@RajThackeray) May 14, 2022
राज यांनी पुढे लिहीले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्षे कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो, तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे, असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
राज यांनी पत्रात पुढे लिहीले आहे की, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा आहे. पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे. कारण हा अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होते,समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच राज्य सरकारनं याचा नीट छडा लावून हा गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा, असे राज यांनी म्हटले आहे.