नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय चलनातून २ हजार रुपयांची नोट रद्द करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतल्यामुळे पुन्हा एकदा देशात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात. हा धरसोडपणा आहे. असं सरकार चालत का? असा सवाल करत राज ठाकरेंनी मोदी सरकारला सुनावले आहे. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
२ हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. ज्या नागरिकांकडे दोन हजाराच्या नोटा असतील त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत त्या बँकेत जमा करता येतील किंवा बदलून मिळतील, असे रिझर्व्ह बँकेने निर्देशित केले आहे. यावर राज ठाकरे म्हणाले की, “हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली नसती. कधीही गोष्ट आणायची, कधीही बंद करायची, त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या, तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. हे असले निर्णय परवडणारे नसतात देशाला. आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का?” असा खोचक सवालच ठाकरे यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
https://twitter.com/RajThackeray/status/1659843599180218368?s=20
MNS Chief Raj Thackeray on 2 Thousand Notes Banned