नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे रोजगाराच्या नव्या संधी डोकावताना दिसतात, चांगल्या रस्त्यांमुळे हा विकासाचा वेग अजुन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, ड्राय पोर्ट हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट असून द्राक्ष, कांदे आणि ऑटोमोबाईल्स च्या क्षेत्रातील निर्यात थेट येथून व्हावी आणि येथेही थेट आयात वाढावी व नाशिकला आयात-निर्यातीच्या क्षेत्रात देशातील अग्रगण्य ठिकाण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आज केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
आज इगतपुरी येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भारत सरकार यांचेमार्फत आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या 226 की.मी. लांबीच्या 1830 कोटींच्या प्रकल्पांचा कोनशिला अनावरण व लोकार्पण समारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे, हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, ॲड. माणिकराव कोकाटे, ॲड. राहुल ढिकले, हिरामण खोसकर, मोहम्मद खालिद, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाप्रबंधक (तांत्रिक) प्रशांत खोडस्कर, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकारण नाशिकचे प्रकल्प संचालक बी. एस. साळुंखे, इगतपुरी प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. गडकरी म्हणाले, मी आपल्याला विश्वास देवू इच्छितो की, रोड, रेल्वे आणि ॲव्हिएशन यांचा उपयोग करून आयात-निर्यातीचं प्रमुख केंद्र नाशिकला बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ज्यावेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे ची निर्मिती केली गेली त्याचवेळी मुंबई-नाशिक या हायवेचाही त्याच धर्तीवर विकास करण्याचा मानस होता, परंतु तांत्रिक अडचणींमुळे तो त्यावेळी होवू शकला नसला तरी समृद्धी महामार्ग नाशिकमधून गेल्याने तो मानस आज पूर्ण होताना दिसतो याचा आनंद निश्चितच आहे. येणाऱ्या काळात या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्यात येईल, असा विश्वासही यावेळी केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
आज विशेषत: नांदगाव ते मनमाड या भागात २५३ कोटी रूपयांची कामे झाली आहेत. या कामांमुळे सुरत-नागपूर हा महामार्ग धुळे-औरंगाबाद-सोलापूर हा साक्री-शिर्डी यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या महामार्गामुळे जळगाव-नाशिकमधील संपर्क सुधारणार असून त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे. त्याचबरोबर मनमाड येथील पाणेवाडी येथील बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या डेपोंना आसपासच्या शहराला जोडणे सहज शक्य झाले आहे. नाशिकला अपघातमुक्त शहर करण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याची अपेक्षाही यावेळी श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.
एकूण ७ कामांचे आज भूमिपूजन होत आहे, त्यांची लांबी २०५ किलोमीटर इतकी आहे. त्यासाठी १५७७ कोटी रूपयांची ही कामे आहेत. धुळे लोकसभा मतदार संघातीलही महत्वाच्या कामांचा त्यात समावेश आहे. गोंदे ते पिंप्री सदो सेक्शनचे सहा पदरीकरण हे आपण आज करतो आहोत. समृद्धी महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर वडपे पर्यंत वाहतुक मोठ्या प्रमाणात असणार आहे. या भागात खर्डी एमआयडीसीत लॉजेस्टिक पार्क मोठ्या प्रमाणात आहेत. वडपे या ठिकाणी समृद्धी महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग व मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग एकत्र येतात, त्यामुळे येणाऱ्या काळात वडपे हे महत्वाचे जंक्शन होणार आहे. जे.एन.पी.टी. ला त्याचा थेट फायदा होण्याबरोबरच येथील आयात निर्यात अधिक सुलभ व जलदगतीने होणार आहे. येथून आपण दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात सहज आणि जलदगतीने पोहोचणार आहोत, त्यामुळे नाशिकचे महत्व अधिकच वाढणार आहे.
या महामार्गासोबतच महत्वाचा महामार्ग सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस असून या महामार्गामुळे फार मोठी क्रांती या भागात होणार आहे. त्याची किंमत जवळपास ८० हजार कोटी इतकी असून त्यातील नाशिक जिल्ह्यात १० हजार कोटींच्या रस्त्याचे काम होणार आहे. १२९० किलोमीटरचा हा मार्ग १० तासात चेन्नईमध्ये आपल्याला पोहोचवणार आहे. त्यामुळे नाशिकहून दक्षिणेत जाण्यासाठी उत्तम सोय होणार आहे. हा महामार्ग नाशिक-अहमदनगर-बीड-उस्मानाबाद- सोलापूर अशा पाच जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रात याची लांबी ४८२ किलोमीटर इतकी आहे. नाशिक जिल्ह्यात तो १२२ किलोमीटर इतका असणार आहे. त्यातील बहुतांश भूभाग हा आदिवासी बहुल क्षेत्रातून जाणार आहे, त्यामुळे या रस्त्याच्या आजूबाजूला उद्योग, लॉजेस्टिक पार्कसह विविध योजनांच्या वाढीस वाव मिळणार आहे. यावेळी नाशिकरोड ते द्वारका चौक यामार्गावर 6 कि.मी. च्या डबल डेकर उड्डाणपुलाच्या कामाला 1600 कोटींच्या निधीसह मंजुरी देण्यात आली असल्याचेही श्री. गडकरी यांनी यावेळी जाहिर केले.
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या लोकापर्णातून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात रस्ते विकासाचे जाळे विणले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्ह्यातील 226 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे लोकापर्ण केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्ह्यातील रस्ते विकास कामांसाठी केंद्र सरकारमार्फत 5 हजार कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देण्यात आला. श्री. गडकरी यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनातून विकासनशील शहरांसोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांचा सुद्धा विकास होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या विकासामुळे रोजगार निर्मीतीला चालना मिळाली असून जिल्ह्यातील कृषी उत्पादन इतर शहरांमध्ये वेळेत पोहचण्यासाठी मदत होत आहे. नाशिक दिंडोरी येथील सप्तश्रृंगी रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, अशी मागणी डॉ. पवार यांनी करून जिल्ह्यात रस्ते विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीसाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने आभासी पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ता कामांचे लोकार्पण व कोनशिला अनावरण केले. यावेळी सर्व उपस्थित खासदार व आमदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रकल्पांचे झाले कोनशिला अनावरण-
– गोंदे ते पिंपरी – सदो फाटा (रा.म.क्र.३) सहापदरीकरण. (लांबी : २० कि.मी., किंमत : ८६६ कोटी)
– सटाणा ते मंगरुळ (रा.म.क्र.७५२जी) खंडाचे रुंदीकरण व दर्जोन्नतीकरण. (लांबी : ३७ कि.मी., किंमत : ४२९ कोटी)
– १० वा मैल, जऊळके-दिंडोरी व आंबेबहुला (रा.म.क्र.३) येथे भुयारीमार्ग (VUP) व उड्डाणपूल (Flyover). (लांबी : ४.३ कि.मी., किंमत : २११ कोटी)
– खंबाळे ते पहिने व शतगाव ते अंबोली (रा.म.क्र.१६० अ) मजबुतीकरण. (लांबी : ३० कि.मी., किंमत : ३८ कोटी) गुरेवाडी फाटा ते सिन्नर (रा.म.क्र.६०) खंडाचे मजबुतीकरण. (लांबी : ९ कि.मी., किंमत : १४ कोटी)
– घोटी-सिन्नर (रा.म.क्र.१६०अ) मार्गावरील रस्ता सुरक्षा सुधार कार्य. (लांबी : ५३.५०० कि.मी., किंमत : ११ कोटी) पिंपळगाव – नाशिक – गोंदे (रा.म.क्र. ३) LED पथदिवे लावणे. (लांबी : ५१ कि.मी., किंमत : ७.५ कोटी)
या प्रकल्पाचे झाले लोकार्पण
– नांदगाव ते मनमाड (रा.म.क्र.७५३जे) खंडाचे रुंदीकरण व दर्जोन्नतीकरण. (लांबी : २१ कि.मी., किंमत : २५३ कोटी)
प्रकल्पांचे फायदे
ओझर विमानतळास सहज व सुरक्षित कनेक्टिव्हिटी
कृषी उत्पादने मोठ्या बाजारपेठेत (मुंबई) पाठवणे सहज शक्य
ग्रामीण भागातून शहराकडे जलद व सुलभ प्रवास
आर्थिक विकास व नवीन रोजगाराच्या संधी
इंधन व वेळेची बचत; प्रदुषणाला आळा
समृध्दी द्रुतगती मार्गाशी (मुंबई-नागपूर) सुलभ व सुरक्षित कनेक्टिव्हिटी
गोंदे औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध
आधुनिक रस्त्यांची बांधणी व त्याद्वारे जागतिक दर्जाचा संपर्क
Minister Nitin Gadkari Dream Project Nashik Development
Highway Infrastructure Connectivity