मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील राज्य पदाधिकारी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांशी आणि महाराष्ट्र सैनिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, पण ते मतदान कुठेतरी गायब झालं. अशाप्रकारे निवडणुका लढवल्या जाणार असतील तर निवडणुका लढवायच्या कशा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला. ते म्हणाले की, तुम्ही म्हणाल राज ठाकरेंचा पराभव झाला, म्हणून बोलतोय. मीच काय असं संपूर्ण महाराष्ट्र बोलतोय. भाजपला मिळालेलं यश समजू शकतो.. पण अजित पवार यांना ४०+ आमदार ? ज्यांच्या ५ जागा येतील असं वाटत नव्हतं ते अजित पवार ४०+ जागा घेतात आणि ज्यांच्या जीवावर हे लोकं मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त १० जागा? लोकसभेला काँग्रेसला १३ खासदार होते आणि विधानसभेला १५ आमदार? शरद पवार साहेबांचे ८ खासदार निवडून आले त्यांचे फक्त १० आमदार येतात? आणि अजित पवारांचा फक्त १ खासदार निवडून आला त्यांचे ४२ आमदार येतात? या मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, पण ते मतदान कुठेतरी गायब झालं. अशाप्रकारे निवडणुका लढवल्या जाणार असतील तर निवडणुका लढवायच्या कशा ? हे पण निघून जाईल अर्थात.. कोणीच अमरपट्टा घेऊन आलेलं नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संवाद साधतांना ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय कळला नाही, पचला नाही. माझ्याकडे संघ परिवाराशी संबंधित एक व्यक्ती आली होती, ते म्हणाले ‘इतना सन्नाटा क्यो है भाई, कोई तो जिता होगा… कोणीतरी जिंकलं ना मग जल्लोष का नाही ? आमचे राजू पाटील यांचं एक गाव आहे ज्यात १४०० लोकं राहतात. त्या राजू पाटील यांच्या गावात त्यांना एकही मत पडलं नाही… कसं शक्य आहे ? जी १४०० मतं राजू पाटील यांना पडायची त्यांच्या गावातील एक मत नाही पडलं ? आपल्याकडे मराठवाड्यातला एक नगरसेवक आहे जो विधानसभेला उमेदवार होता. नगरसेवकाच्या निवडणुकीला त्याला साडेपाच हजार मतं होती आणि आता विधानसभेला फक्त अडीच हजार मतं मिळाली ? बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सातवेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आमदार, या निवडणुकीत १० हजार मतांनी पडतात ?
यावेळी त्यांनी छावा चित्रपटांबाबत बोलले. परवा छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा करणारे दिग्दर्शक लक्षण उतेकर भेटून गेले. हा सिनेमा खरंच पहा कारण छत्रपती शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा आहे तर छत्रपती संभाजी महाराज हे आपलं बलिदान आहे. या सिनेमात संभाजी महाराज लेझीम खेळताना दाखवलेत त्यावरून वाद सुरु होता असं मला कळलं. मी दिग्दर्शकांना विचारलं की त्या लेझीम नृत्याने सिनेमा पुढे सरकत नाहीये ना, मग काढून टाका. संभाजी महाराजांवर औरंगजेबाने जे अत्याचार केले ते लोकं बघायला जाणार. लोकांच्या मनात ज्या प्रतिमा असतात तसं दाखवावं.
या संवाददात त्यांनी मनसैनिकांना सांगितले की, पक्षाने जी कामं केली, आंदोलनं केली, ते तुम्ही महाराष्ट्र सैनिकांनी लोकांसमोर मांडलं पाहिजे.. तुम्हाला लोकांनी प्रश्न विचारले तर भांबावून जाऊ नका…जाणीवपूर्वक अपप्रचार सुरु असतो त्याला खंबीरपणे उत्तर दिलं पाहिजे. अनेक पत्रकार काही नेत्यांच्या दावणीला बांधले गेलेत. त्यांना उत्तर द्या. राज ठाकरेंनी भूमिका बदलल्या… भूमिका बदलणं कशाला म्हणतात… मी काही संदर्भ घेऊन आलो. देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक ही १९५२ ला झाली. त्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा म्हणजे ‘जनसंघ’… १९७५ ला इंदिराबाईंनी आणीबाणी आणली.. पुढे आणीबाणी गेली आणि निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला. आणि १९७८ ला जनता पक्षाचं सरकार आलं. त्यात जनसंघ होता. पुढे जनता पक्ष फुटला, सरकार कोसळलं आणि त्यातून १९८० ला भारतीय जनता पक्ष जन्माला आला. त्या पक्षाचे अध्यक्ष झाले अटलबिहारी वाजपेयी.. अटलजींनी पक्षाची भूमिका बदलली आणि त्यांनी गांधीवादी समाजवादाची भूमिका घेतली…
१९७८ ला शरद पवार वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्री झाले. त्या पुलोदमध्ये जनसंघ पण सामील होता. त्याच काळात शिवसेनेने काँग्रेसच्या आणीबाणीला पाठींबा दिला. १९८० ला शिवसेना काँग्रेस युती होती आणि तेंव्हा शिवसेनेने एकही जागा लढवली नाही. पुढे १९८० ला इंदिरा गांधींनी पवारांचं सरकार बरखास्त केलं. पुढे १९८० ते १९८६ पवार सत्तेत नव्हते. आणि पुढे शरद पवार पुन्हा १९८६ साली काँग्रेसमध्ये गेले. १९८६ ला महापालिकेची निवडणूक झाली जिथे शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली. १९८४ ला शिवसेनेचे २ उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभे होते. १९८९ ला शिवसेना भाजप युती झाली… १९९५ ला शिवसेना भाजप सत्तेत गेले. १९९९ ला शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस सुरू केला… आणि ज्या कॉग्रेसला शिव्या दिल्या त्याच काँग्रेससोबत येऊन त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. हे सगळं का मी सांगतोय कारण सगळ्यांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या, पण मला सांगा की मी कुठल्या स्वार्थासाठी भूमिका बदलली ?
माध्यमं एककल्ली झाली आहेत… त्यांचा अभ्यास नसतो.. माझ्याबद्दल काय पसरवलं जातंय की मी मोदींना पाठींबा दिला, पुढे विरोध केला आणि माझ्यामागे ईडी लावली म्हणून पुन्हा मोदींना पाठींबा दिला… त्या ईडी प्रकरणावर आज मी बोलणार आहे… महाराजांची शपथ घेऊन सांगतो जे सांगतोय ते खरं आहे… मी २००५ ला पेपरात बातमी वाचली की सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, की एनटीएससीच्या अंतर्गत ज्या मिल येतात यांच्या कामगारांचे पैसे देऊन टाका… त्या यादीत कोहिनुर मिल होती… मी माझ्या व्यावसायिक सहकाऱ्याला सांगितलं की कोहिनुर मिलसाठी टेंडर भरा… टेंडर भरलं… टेंडर आम्हाला मिळालं… पण त्यासाठी लागणारे ४०० कोटी कुठून आणायचे… मला पण जरा चिंता होती.. मग आम्ही आयएल अँड एफएस ला विचारलं.. त्यांनी ४०० कोटी द्यायची तयारी दाखवली… पुढे ते प्रकरण परत कोर्टात गेलं.. या मधल्या काळात आमच्या लक्षात आलं की हा पांढरा हत्ती आहे… आम्ही ठरवलं की आपण यातून बाहेर पडायचं… आम्ही आमचा हिस्सा विकला… पुढे ईडीची नोटीस आली… मला कळलं नाही की नक्की काय घडलं.. कारण आम्हाला जे पैसे आले त्यावर आम्ही आमचा टॅक्स भरला… पण पुढे कळलं की आमच्यातल्या एका पार्टनरने टॅक्स नाही भरला… त्यावर आमच्या सीएने सल्ला दिला की परत टॅक्स भरावा लागेल… आम्ही तो पण भरला… राज ठाकरेचे व्यवहार इतके स्वच्छ असतात, तो ईडीला घाबरेल ?
मोदी ४ दिवस आधी म्हणाले होते ७०,००० कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना जेलमध्ये टाकू, त्यानंतर मोदींनी त्यांना जेलच्या ऐवजी डायरेक्ट मंत्री मंडळात घेतलं… भाजपने हेमंत बिस्वा शर्मा यांना भ्रष्टाचाराचा चेहरा म्हणलं आणि त्यांना पुढे पक्षात घेतलं, त्यांना आसामचे मुख्यमंत्री केलं… मुकुल रॉय यांच्यावर भाजपने घोटाळ्याचे आरोप केले… त्यांना भाजपने पक्षात घेतलं…बीएस येडियुराप्पाना पक्षातून दूर केलं आणि पुढे पुन्हा त्यांना जवळ केलं मुख्यमंत्री केलं… मुफ्ती मोहम्मद सईद, फारूक अब्दुल्ला ज्यांचा काश्मीरमध्ये ३७० कलमाला पाठींबा होता त्यांच्यासोबत भाजपने युती केली…भाजपने महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना पुढे पक्षात घेतलं आणि त्यांना मंत्री केलं…
शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्ष ते मुस्लिम लीग सोबत युती केली.. पुढे काँग्रेससोबत पण युती केली होती.. थोडक्यात त्या त्या वेळेला गरज बघून युती केली… सगळ्यांनी भूमिका बदलल्या, वाट्टेल त्या युत्या केल्या… त्या चालतात… पण त्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार… हा कुठला न्याय….
फडणवीसांनी, किरीट सोमय्यांनी किती लोकांवर आरोप केले, ते सगळे भाजपमध्ये आले… लोक हल्ली देव पाण्यात घालून बसतात की किरीट सोमय्यांनी किंवा फडणवीसांनी आरोप केले की पक्षात घेतात, पुढे मंत्री करतात. मला भाजपचे लोक भेटायला येतात.. मी त्यांना काय नाही म्हणू ? तुमच्या घरी चहा प्यायला येतो कोणी म्हणलं तर तुम्ही नाही म्हणाल का ? बरं माझ्याकडे चहा प्यायला कोणीही आले तरी मी तुम्हाला कधी विकलं नाही, माझ्या भूमिकेशी प्रतारणा केली नाही… मध्ये एकदा चंद्रकांत पाटील एकदा सहज चहा प्यायला आले, बाहेर पडल्यावर त्यांना पत्रकारांनी विचारलं एक तास काय चर्चा झाली…काय वाट्टेल ते विचारत बसतात… मी पुन्हा सांगतो कोणीही भेटून गेलं तरी तुमच्यावरचं प्रेम आणि पक्षाची भूमिका याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही…
महापालिका निवडणुका कधी होतील माहित नाही ? मी तुम्हाला सांगतो आत्ता उगाच खर्च करू नका, नाहीतर आत्ता खर्च कराल आणि मग माझ्याकडे निवडणुकीच्या वेळेला खिसा रिकामा घेऊन याल..येत्या काळात पक्षात खालपासून वरपर्यंत आचारसंहिता येईल.. पुढील १५ दिवसांत प्रत्येकाला जबाबदारी आणि आचारसंहिता आखून देईन.. मी अनेक पराभव पाहिलेत.. पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही… खचलेल्यांचं नेतृत्व मला करायचं नाहीये. या राज्यातील मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी जे करायचं आहे ते मी करणार, ते आपलं स्वप्न आहे… वेळ लागेल पण करणार हे नक्की…