अजय सोनवणे, मनमाड
मनमाड – केंद्र सरकारच्या आरोग्य विभाग, कुटुंब आरोग्य सर्वेक्षण -५ च्या अहवालात जैन धर्मीयांच्या श्रद्धेला, भावनेला आघात पोहचविणारा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालाचा मनमाड शहर सकल जैन समाज तसेच जैन बांधवांनी तीव्र निषेध करून मूक मोर्चा काढून केंद्र सरकार प्रती आपली नाराजी व्यक्त केली. जैन समाज आणि जैन समाजाचाच्या सिद्धांताची केंद्र सरकार मधील अनेक मंत्र्यांनी वेळोवेळी प्रशंसा केलेली आहे. याचा सुद्धा विसर केंद्र सरकारला पडला की काय असा प्रश्न जैन समाजाने उपस्थित केला आहे. अल्पसंख्यांक असलेला जैन समाजाबद्दल केंद्र सरकारने जाहीर केलेला अहवालच मुळात चुकीचा असून प्रसिद्ध करण्यापूर्वी सरकारने त्याचे अवलोकन करणे गरजेचे होते असेही जैन समाजाचे म्हणणे आहे. जैन समाजाच्या भावनेशी,श्रद्धेशी खेळ करणाऱ्या केंद्र सरकारच्या अहवालाचा तीव्र शब्दात मनमाडच्या जैन बांधवांनी निषेध केला आहे. या मूक मोर्चाची सांगता तलाठी कार्यालय येथे मंडल अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात जैन बांधव उपस्थित होते. संपूर्ण विश्वाला अहिंसा, शुद्ध शाकाहार आणि जियो और जिने दो चा संदेश देणाऱ्या भगवान महावीर स्वामींच्या शिकवण आणि धर्माचे तंतोतंत पालन करणाऱ्या जैन समाजा विषयी हा अहवाल चुकीचा असल्याचे म्हटले आहे.