मनमाड – शहरातून जाणाऱ्या इंदुर -पुणे महामार्गावरील खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकीस्वार ट्रकखाली आल्याने जागीच ठार झाला. या घटनेमुळे परीसरात शोळकळ पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्युचा सापळा बनलेले रस्ते अजून किती जीव घेणार असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथे राहणाऱ्या गणेश भाऊसाहेब माळकर ( वय २२ ) हा कामासाठी मोटार सायकल क्र.एचएच १७ डब्ल्यू ३३६५ या गाडीवरून मनमाडला येत असताना शहरातील आयसीआयसीआय बॅंकेसमोर खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रक क्रंमाक एमपी ०७ एचपी ५९०८ या गाडीखाली सापडून त्याचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी मनमाड पोलिस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पी.बी.गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान मनमाड शहरासह गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे झाले असतांना देखील संबंधित ठेकेदार हे खड्डे बुजविण्यासाठी असमर्थ ठरत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे अनेकांचे जीव जात असताना देखील संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदार नेमके करतात तरी काय ? असा संतप्त सवाल येथील रहिवाशी व नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे तातडीने या महामार्गावरच्या रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राजकीय पक्ष संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.