मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव तालुक्यातील दहिदी शिवारात कांद्याच्या शेतात पाणी भरायला गेलेल्या सुमनबाई भास्कर बिचकुले या विवाहत महिलेचा तीन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना घडली होती. या खूनाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. लूट करण्याच्या उद्देशाने या महिलेचा अज्ञाताने दोन्ही पाय फावड्याने तोडून तिच्यावर वार करत तिचा खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेची जिल्हा पोलिस अधिक्षकांनी तात्काळ याची दखल घेत तपासाची चक्र फिरवली, आरोपीने महिलेला शेतात एकटे असल्याचे पाहून तिच्या अंगावर असलेले चांदीचे दागिने पाहून तिला फरफटत जंगलात नेले आणि तिच्या पायावर वार करत पायातील चांदीचे दागिने पाय तोडून काढत फरार झाला होता. पोलिसांच्या पथकाने तपास करीत फरारी आरोपीला ताब्यात घेतले. संशयित आरोपी चांदीचे दागिने घेऊन जिल्ह्यातील करंजवण येथील सोनाराकडे गेला असता संबंधित सोनाराने याची माहिती पोलिसांना कळविली आणि आरोपी डोंगराळे शिवारात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. मात्र पोलिसांना पाहताच आरोपीने तलावात उडी मारली अखेर दोघा पोहणा-यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात येऊन ताब्यात घेण्यात आले. लूट करण्याच्या उद्देशाने आरोपी किरण ओमकार गोलाईत याने हे कृत्य केले असून मालेगाव तालूका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.