मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव महापालिकेत आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महापौरांसह तब्बल २७ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे हे सर्वजण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. महापौरांसह प्रथमच एवढे नगरसेवक पक्षांतर करीत असल्याने ही बाब राज्यस्तरावर चर्चेची ठरत आहे.
काँग्रेसचे माजी आमदार रशिद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मालेगाव शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे. गेल्या दोन वर्षात मालेगावच्या विकासासंदर्भात काहीही विकासकामे झालेली नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्याचे ऊर्जा खाते काँग्रेसकडे आहे. मात्र, मालेगावसाठी काहीही ठोस प्रयत्न होत नाहीत, हे लक्षात आल्यानेच आम्ही काँग्रेस पक्षाचा त्याग करुन आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निश्चय केल्याचे शेख यांनी स्पष्ट केले.
रशीद शेख यांच्या पत्नी ताहिरा शेख या सध्या महापौर आहेत. त्यांच्यासह एकूण २७ नगरसेवक लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तशी माहिती रशीद शेख यांनी दिली आहे. तर, रशीद शेख यांचे पुत्र आसीफ शेख यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता मोठ्या प्रमाणात नगरसेवकांची फौज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच, शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी बळकट होण्याच्या दिशेने पावले पडत आहेत. तर, काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस कमजोर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा प्रवेश सोहळा नक्की कधी होणार याबाबत स्पष्टता आलेली नाही. मात्र, लवकरच हा सोहळा होणार असल्याचे सांगितले जात आहे.