मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपीला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सपशेल नकार दिला आहे. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि सध्या तरी त्यांना दिलासा मिळणार नाही, असेच स्पष्ट केले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला सध्या एनआयए न्यायालयात सुरू आहे आणि या खटल्याला स्थगिती मिळणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने खडसावून सांगितले आहे. या याचिकेत प्रसाद पुरोहित यांची निर्दोष मुक्तता करण्याची मागणी करण्यात आली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत उलट एनआयए न्यायालयाला आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. आपल्यावर खटला चालविण्यासाठी भारतीय सैन्याची परवानगी आवश्यक आहे, असा युक्तिवाद प्रदास पुरोहित यांच्यावतीने करण्यात आला होता. पण, ही परवानगी घेण्यासाठी वेगळ्या अटी आहेत आणि त्या तुमच्या प्रकरणास लागू होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मालेगाव येथे २००८ मध्ये सायकलमध्ये बॉम्ब ठेवून स्फोट घडविण्यात आला होता. या प्रकरणात प्रसाद पुरोहित यांच्यासह दिग्गजांना अटक झाली होती. यात खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांचाही समावेश होता. पुरोहित यांना २०१७ मध्ये जामीनही मंजूर झाला होता. विशेष म्हणजे प्रसाद पुरोहित यांनी अभिनव भारत नावाची संघटना सुरू करणे आणि संघटना सुरू करण्यामागची उद्दिष्ट्ये जाहीर करणे, यातच घटनेचे मुळ होते. कारण या संघटनेने आपल्याला संविधान मान्य नाही आणि संपूर्ण राष्ट्र हिंदू राष्ट्र करायचे आहे, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. यापूर्वी एनआयएने मालेगाव बॉम्बस्फोट घडविणे हे प्रसाद पुरोहित यांच्या कर्तव्यात समाविष्ट नव्हते, असे स्पष्ट केले आहे. न्या. ए.एस. गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणावर सुनावणी झाली.
Malegaon Bomb Blast Lt Col Prasad Purohit Trouble
Mumbai High Court