माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्रात विशेषतः मुंबईसह कोकणाला दिवसाच्या उष्णतेने चटका दिला आहे. सौराष्ट्र, कच्छ व महाराष्ट्राच्या कोकणपट्टीत सध्या (i) जमिनीपासून दीड ते दोन किमी पर्यन्तच्या हवेच्या थरात वायव्य अरबी समुद्राहून म्हणजे ओमानच्या आखातातून घड्याळ काट्यादिशेप्रमाणे प्रत्यावर्ती चक्रीय वारे वाहत आहेत. त्यामुळे हवेचा उच्च दाब तयार झाला आहे. म्हणजेच हवेच्या घनतेत वाढ झाली आहे. (ii)तापलेले हे दीड ते दोन किमी जाडीचे पार्सल हवेचे पार्सल न विस्कटल्यामुळे आणि (iii) हरियाणाजवळ पश्चिमी झंजावातामुळे घड्याळ काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून उत्तर भारतातून आपल्याकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांना गेल्या काळात अटकाव झाला.
पर्यायाने सदर मोठ्या आकारमानाच्या हवेच्या उष्ण पार्सलमध्ये थंड वाऱ्यांची सरमिसळ झाली नाही. व कोंडलेल्या उष्णतेमुळे मुंबई, कोकणात उन्हाचा चटका कायम राहिला. उद्यापासून मात्र ह्या वातावरणात काहीसा बदल अपेक्षित करू या. हरियाणाजवळील वारे आता क्षीण झाले आहेत.
उद्या, गुरुवार, दि. २३ पासून पुढील ५ दिवस (दि.२८) पर्यंत पहाटेच्या किमान व दुपारच्या कमाल तापमानात सध्याच्यापेक्षा काहीशी घसरण होवून दोन्ही तापमाने सरासरी इतके किंवा किंचितशी अधिक राहण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा रात्रीचा हलकासा गारवा जाणवेल. तसेच सध्याचा असलेला दिवसाचा ऊबदारपणाही काहीसा कमी होवून दुपारचे वातावरणही सुसह्य भासेल. असे वाटते. विशेषतः कोकण, खान्देश, नाशिक, नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात दिवसातील दुपारच्या कमाल तापमानात किंचित घसरण झालेली दिसेल. त्यामुळे तेथे दिवसातील उन्हाचा चटकाही कमी होईल. अर्थात येथेही हे तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक असु शकतात.
शनिवार दि.२५ फेब्रुवारीपासुन नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावातामुळे उत्तर भारतात ज.का., हि. प्र., उ. खण्ड अश्या ३ राज्यात दि.२५ व २६ फेब्रुवारीला गडगडाटीसह पाऊस व बर्फीबारीची शक्यता जाणवते. प्रत्यावर्ती वारे थांबले तर ह्या महिना अखेरीपर्यंतच्या ५ दिवसात महाराष्ट्रात दोन्ही तापमाने वाढणार नाहीत,परिणामी महाराष्ट्रात आल्हादायक वातावरणाची अपेक्षा करू या.
गुजरात व कोकणातील कमाल तापमाने पाहता,उन्हाळ्याचे वेध लवकर लागलेत असे जरी भास वाटू लागलेत तरीदेखील थंडीला पूरक अश्या वातावरणीय घडामोडी संपलेल्या दिसत नाही. त्यामुळे अजुनही महाराष्ट्राच्या ठराविक ठिकाणी काहीश्या किंचित थंडीची अपेक्षा करू या.
‘रेवट निघालं ‘, ‘ आभट आलं ‘ अश्या पाऊस व गारपीट भितीपोटी विचारणा सध्या होत आहे. वर्तमान स्थितीत मध्य भारतात विशेष परिणाम करणारी घडयाळ काट्यादिशेप्रमाणे जमिनीपासून अधिक उंची पर्यन्त वाहणारे प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची गैरहजरी पाहता महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहून पाऊस अथवा गारपीटीची कोणतीही शक्यता सध्यातरी मुळीच जाणवत नाही. सध्याच्या गारपीटीच्या कालावधीतून आपण सुरक्षितपणे बाहेर पडत आहोत ह्याची निसर्गाप्रति उपकारक नोंद शेतकऱ्यांच्या मनी असावी, असेही वाटते.
गेल्या ५ दिवसात दुपारी ३ ते रात्री १० दुपारी पर्यन्त ज्या शेतकऱ्यांनी कांदापिकाला पाणी भरले असेल तर येत्या १५ दिवसात त्यांनी पिकावर होणारा परिणामाचा अनुभव कळवावा. शक्यतो येथून पुढे दुपारी ३ ते रात्री १० दरम्यानचे कांदा पिकाचे सिंचन करू नये असे वाटते.
आज विशेष इतकेच!
Maharashtra Weather Climate Forecast Upcoming Days