मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्य माणसाच्या मुलभूत गरजांप्रमाणेच कारागृहातील कैद्यांच्याही सोयी-सुविधांचा विचार काही प्रमाणात केला जातो. अर्थात कैदी निर्ढावणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाते. अलीकडेच राज्यातील जवळपास चार हजार कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे कारागृह अतिरिक्त संचालक अमिताभ गुप्ता यांनी अलीकडेच याची माहिती दिली.
राज्यातील कारागृहांमध्ये जवळपास ४ हजार कैदी असे आहेत, ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे. यापैकी बहुतांश कैदी विविध आजारांनी ग्रस्त आहेत. अशात त्यांची झोप नीट होत नाही. त्यामुळे त्यांना उशी आणि गादी वापरता येणार आहे. अमिताभ गुप्ता यांनी याची घोषणा केली. गादी आणि उशी कैद्यांना स्वतःच्या खर्चाने आणायचे आहे. त्याचा आकार प्रशासनाने निश्चित करून दिला आहे. ते नियम पाळणाऱ्या कैद्यांनाच ही सुविधा वापरण्याची परवानगी असणार आहे.
केवळ ज्येष्ठ कैद्यांसाठी म्हणजे ५० पेक्षा जास्त वय असलेल्या कैद्यांसाठीच आहे, असेही त्यांनी सांगितले. तुरुंग विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतरच गुप्ता यांनी हा निर्णय जाहीर केला. सर्वसामान्य माणूस झोप नीट झाली नाही तर अस्वस्थ असतो. चिडचिड करतो. बरेचदा त्याला विविध आजारांचा विळखाही बसतो. अशात कारागृहात तर कैदी राहतात. त्यांना किमान उतारवयात रात्रीची झोप नीट घेता यावी, यासाठी हा निर्णय आवश्यक होता, असे गुप्ता म्हणाले.
ताडपत्री आणि चादर
सध्या कारागृहात कैद्यांना झोपण्यासाठी ताडपत्री आणि चादर दिली जाते. सर्व कैद्यांसाठी हा एकच नियम आहे. पण ज्येष्ठ कैद्यांना मात्र यापुढे ताडपत्री आणि चादरीपासून मुक्ती मिळणार आहे. त्यांना गादी आणि उशीची सुविधा मिळणार आहे.
त्यांनाही मिळणार सुविधा
सध्या कारागृह प्रशासनाने ज्येष्ठ कैद्यांसाठीच ही सुविधा जाहीर केली असली तरीही आणखीही काही कैद्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. ज्या कैद्यांना गादी आणि उशीची गरज आहे, त्यांना डॉक्टरांनी प्रमाणित केले असेल तर सुविधा पुरवली जाईल, असाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे,
Maharashtra Prisoners Will Get This Facility