औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणाऱ्या लम्पी आजारावर नियंत्रण मिळवल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. या आजारामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र गावपातळीवर परिस्थिती उलट असल्याचे चित्र काही प्रकरणांमुळे दिसून येत आहे.
जालना येथील बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे लम्पी या संसर्गजन्य आजारामुळे ११ ऑक्टोबरपर्यंत १६ जनावरे दगावली असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनातील जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या गावाकडे पाठ फिरवून बहिष्कार टाकल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच एका संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवून मदतीची मागणी केली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी या संसर्गजन्य आजार दिसून येत आहे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात ५० जनावरांचा या संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला आहे. त्यातील १६ जनावरे एकट्या रोषणगावातील असल्याचा दावा कृष्णा खरात यांनी ग्रामस्थांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या रक्ताच्या पत्राद्वारे केला आहे. तर रोषणगावात गावात एकूण ७४९ जनावरे आहेत. सध्या २०१ जनावरे लम्पी आजाराने बाधित आहेत, तर सोळा जनावरे दगावली आहेत.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष…
लम्पीने जनावरांच्या मृत्यूविषयी शेतकऱ्यांनी काही अधिकारी, कर्मचाऱ्यांजवळ भावना मांडण्याचा प्रयत्न केला परंतु, या भावनांना अरेरावीचे स्वरूप अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे गटविकास अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकाने दीड महिन्यापासून रोषणगाव ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून सरकारने ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी गावातील तरूण शेतकरी कृष्णा एकनाथ खरात यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
गावावर बहिष्कार….
गावातील परिस्थितीबाबत अनेकदा गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना सांगूनही ते महिनाभर गावात आले नाही. म्हणून त्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार केली. ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी संघटनांनी गावावर बहिष्कार टाकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे प्रचंड हाल होत असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Lumpi Skin Disease Government Farmer Blood Letter