नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोकण कृषी पर्यटन विकास संस्थेने जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सभागृहात आयोजित केलेल्या कोकण आंबा महोत्सवात यंदा सुमारे १०००० पेट्यांची विक्री झाली आहे. आज सुमारे ३००० पेट्या कच्चा हापुस आंबा पेट्या दाखल झाल्या आहेत. हापुसचा सिझन साधारण २० मे नंतर संपणार असल्याने नाशिककरांना पुढेही किमान १५ दिवस ओरिजनल हापुसची चव चाखता यावी यासाठी महोत्सवातील शेतकर्यांनी हापुस, पायरी व केशर आंब्याच्या ३००० पेक्षा जास्त आंबा पेट्या महोत्सवात आणल्या आहेत. आता आंब्याची आवक वाढली असल्याने दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. ग्राहकांनी कच्चा आंबा खरेदी करुन पिकवावा असे आवाहन आयोजक दत्ता भालेराव यांनी केले आहे.
बाजारात मोठ्या प्रमाणावर कर्नाटक व इतर ठिकाणचा आंबा कोकणातील हापुसच्या नावाखाली विकला जातो. त्यामुळे कोकण आंबा महोत्सवात आंबा उत्पादक शेतकरी स्वतः आंबा विक्री करत आहेत. तसेच हवामान बदलाची चिन्हें दिसत असल्याने साधारण २० मे नंतर हापुस आंब्याची आवक कमी होईल. तसेच आंब्याचे दरही वाढतील यासाठी ग्राहकांनी आताच मोठ्या प्रमाणावर कच्चा आंबा घेऊन ठेवावा. कोकण आंबा महोत्सवात आंबा , काजू,फणस ,करवंद, आवळा इ. पासुन तयार केलेला कोकण मेवाही उपलब्ध आहे. आतापर्यंत सुमारे १६५ पर्यटकांनी कोकण सहलींचे बुकिंग केले आहे. सदर कोकण आंबा महोत्सव दि. १६ मे पर्यंत सुरु राहील असे अयोजकांनी कळविले आहे.