अश्विनी भाटवडेकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे तो अधिकच खुमासदार होतो. या कार्यक्रमामुळे अनेकांची स्वप्ने साकार झाली आहेत. यात जिंकलेल्या स्पर्धकांना पैशांसोबतच लोकांमध्ये एक ओळख मिळाली. तर मोठ्या कष्टाने परिस्थितीतून मार्ग काढत आपले ध्येय गाठणाऱ्या लोकांच्या अनेक कहाण्या देखील याच माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या. यातीलच एक आहे, रवी मोहन सैनी. केबीसी ज्युनियर पर्वात सर्व १५ प्रश्नांची उत्तरे देत १ कोटी रुपये जिंकले होते. हे सगळं आज सांगायचं कारण म्हणजे तेव्हाचा हा १४ वर्षांचा मुलगा आज आयपीएस अधिकारी झाला आहे.
केबीसीमध्ये येणं हे त्याचं ध्येय होतं. त्याप्रमाणे हॉट सीट मिळताच त्याने सर्वच्या सर्व १५ प्रश्नांची योग्य उत्तरे देत १ कोटी रुपये जिंकले होते. बारावी नंतर त्याने एमबीबीएसचे प्रशिक्षण घेतले. २०१२ मध्ये त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यात त्याला यश आले नाही. पण मुळच्याच हुशार असलेल्या रवी सैनी याने पुन्हा प्रयत्न करत यात यश मिळवले. देशसेवेचे हे बाळकडू त्याला त्याच्या घरातूनच मिळाले आहे. त्याचे वडीलही नौदलात आहेत. त्यामुळे आपणही देशसेवा करायची हे त्याने ठरवलं होतं आणि आता त्याने ते ध्येय साध्य केलं आहे. सध्या केबीसीचे १४ वे पर्व सुरू आहे. त्यानिमित्त ही प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे.
KBC Show Junior Winner is now IPS Officer