इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटक मधील कोलारमध्ये २०१९ साली केलेल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. या टीकेमुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर खासदारकी रद्द करण्यात आली. आता राहुल गांधी पुन्हा एकदा याच कोलारमध्ये सभा घेतली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या या सभेकडे सगळ्यांचे लक्ष होते. या सभेत राहुल यांनी विविध आश्वासने दिली आहेत.
कर्नाटकात आमचे सरकार आले तर प्रचारात दिलेली आश्वासने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू, असे काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी कोलारमधील सभेत बोलताना म्हणाले. तसेच राहूल गांधी आणखी म्हणाले, कर्नाटकात गृहज्योती योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट वीज मोफत मिळेल. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत २ हजार रुपये दरमहा महिलांना दिले जातील. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अन्नभाग्य योजनेअंतर्गत १० किलो तांदुळ आणि युवा निधी योजनेअंतर्गत प्रत्येक पदवीधरास २ वर्षांपर्यंत ३ हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा होल्डरला १५०० रुपये दिले जातील असे गांधी यावेळी म्हणाले.
आता दिलेली सर्व आश्वासने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण केली पाहिजे, असे मी कर्नाटकातील काँग्रेसच्या नेत्यांना सांगू इच्छितो असेही राहुल म्हणाले. काँग्रेसने कर्नाटकची जनता आणि देशातील जनतेला थेट संदेश द्यायला हवा असे राहुल म्हणाले. पंतप्रधानांना हा संदेश दिला पाहिजे की, तुम्ही हजारो कोटी रुपये अदानीच्या कंपनीला देऊ शकता, तर आम्ही युवकांना, गरिबांना, महिलांना पैसे देऊ शकतो.
राहुल गांधी यांनी सांगितले की, १० मे रोजी विधानसभा निवडणुका होणार असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल, या जय भारत रॅलीत त्यांनी संसदेतून अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला. पुन्हा अदानी मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले की, मी लोकसभा अध्यक्षांना दोन पत्रे लिहून त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्याची परवानगी मागितली होती, परंतु संधी देण्यात आली नाही. इतिहासात पहिल्यांदाच भाजप सरकारने संसदेचे कामकाज होऊ दिले नाही. सहसा, विरोधक संसदेचे कामकाज थांबवतात, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सरकारवरही हल्ला चढवला.
Karnataka Election Congress Manifesto Rahul Gandhi