राहुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आज कांद्याला ८०० ते १००० रूपये प्रती क्विंटल असे सरासरी भाव मिळत असून यामध्ये शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नसल्याने शासनाने त्वरित निर्यात चालू करून नाफेड मार्फत किमान ३००० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करून यावर्षी बाजार समिती मार्फत विक्री झालेल्या कांद्याला प्रती क्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना लॅाकडाऊन, अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. त्यातच शासनाची कुठलीच मदत मिळत नसल्याने चालु वर्षी पूर्ण खरीपातील पिके सततच्या पावसामुळे उपळुन गेली आहेत. काही पिकांचे अल्प प्रमाणात पंचनामे करुन तुटपुंजी मदत देऊन शासन शेतकऱ्यांचे समाधान करण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यातच डिझेल, पेट्रोल, रासायनिक खते, मजुरी, कीटकनाशके यांचे दर खूपच वाढलेले असून एक एक्कर कांदा लागवडीपासून ते भुसार स्टॅाक करेपर्यत किमान नव्वद हजार ते एक लाख पर्यत खर्च येतो. दररोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरत असलेला कांद्याचा जीवनावश्यक वस्तुमध्ये समावेश करुन व निर्यात शुल्क वाढवून बाहेर देशामध्ये मागणी असतानाही सरकार कांद्याची निर्यात करत नसून कायमच कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.
शेतक-यांनी कांदा एप्रिल ते मे महिन्यात काढलेला असून भुसा-यामध्ये ठेवून त्याला आज रोजी पाच ते सहा महिने झाले आहे. त्यात ३० ते ४० टक्के घट झालेली असल्याने आज कांद्याला किमान ३००० रुपये भाव मिळाला तरच शेतकरी, कष्टकरी बळीराजाला दोन पैसे हातात येईल. शासनाने त्वरित योग्य निर्णय न घेतल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. तसेच बाजार समितीत पदाधिकारी व व्यापार्यांच्या संगनमताने भावात गोलमाल केले जाते. त्याकडे शासनाने लक्ष घालावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मिश्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा ईशारा तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी दिला आहे.