कळवण – बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून कळवण आगारांतील २७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारवाईमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी बसस्थानक परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शासनात विलिकारण करण्यासह मागण्या अपूर्ण असतानाच कृती समितीने माघार घेतल्याने संघटनांच्या हातातील आंदोलन कामगारांनी हाती घेतले असून कळवण आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी विलिकारण मागणीसाठी २७ ऑक्टोंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. चौदाव्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. सर्वच चालक व वाहक संपावर असल्याने एसटीची सेवा २७ ऑक्टोंबरपासूनच ठप्प पडली आहे. संप मागे घेण्याबाबत अनेक वेळा आवाहन करण्यात आले. मात्र, कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम असून, जोपर्यंत विलीनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.संपकरी कर्मचाऱ्यांवर पहिली कारवाई करताना संपात सहभागी २७ कर्मचाऱ्यांना एस टी महामंडळाने निलंबित केले आहे. निलंबनाची कारवाई केल्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला असून दिवसभर बसस्थानक परिसरात पोलिसांचा पहारा होता. मात्र, निलंबनाबाबत कार्यवाही झाल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून
३९९ कर्मचारी संपात सहभागी असतांना २७ कर्मचारी का निलंबित असा सवाल निलंबित कर्मचाऱ्यांनी केला आहे.निलंबन कार्यवाही नंतर काेणतीही अनुचित घटना घडली नाही. संपात सहभागी झाल्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाणार, याची खात्री पूर्वीच होती. मात्र, या कारवाईला न घाबरता संप सुरू ठेवला आहे. निलंबनच नाही तर सेवेतून बडतर्फ केले तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया एका आंदोलक कर्मचाऱ्यांने दिली.