मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 15 व्या हंगामाबाबत बोर्डाची योजना काय आहे याची याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, बोर्ड हे यंदा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे अखेरपर्यंत आयपीएलचा 2022 हंगाम आयोजित करण्यास तयार आहे. संघ मालकांच्या इच्छेनुसार आम्ही भारतात आयोजित करण्याचा प्रयत्न करु शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
बीसीसीआयने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये जय शाहने म्हटले आहे की, आयपीएलचा 15 वा सीझन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल, लीगची संभाव्य प्रारंभ तारीख 27 मार्च आहे आणि मे अखेरपर्यंत सामने सुरू राहील, तसेच बहुतेक संघ मालकांनी ही स्पर्धा भारतात व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली.
बीसीसीआयचे सचिव शाह यांनी असेही स्पष्ट केले की, बोर्डाचे पहिले प्राधान्य हे सामाने भारतात आयोजित करणे आहे. तसेच बीसीसीआय अहमदाबाद आणि लखनौ या दोन नवीन संघांसह 2022 हंगाम भारतात आयोजित करण्यास उत्सुक आहे. आयपीएल भारतात आयोजित केले जावे यासाठी आम्ही कोणतीही कमतरता सोडणार नाही. या बैठकीत सहभागी झालेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल आयोजित करण्यासाठी यूएई आणि दक्षिण आफ्रिका हे पर्याय आहेत. खेळाडू, सामना अधिकाऱ्यांसह सर्व भागधारकांची आरोग्य सुरक्षा मंडळासाठी अत्यंत महत्त्वाची आहे यावर शहा यांनी भर दिला.
कोविड-19 च्या नवीन प्रकारांनुसार परिस्थिती सतत बदलत आहे. याबाबत ते म्हणाले, बीसीसीआयने भूतकाळात आपल्या स्टेकहोल्डर्सच्या आरोग्य आणि सुरक्षेशी तडजोड केलेली नाही आणि एकाच वेळी ‘प्लॅन बी’ म्हणजे पर्यायी योजना यावर काम करेल. आयपीएलसाठी खेळाडूंचा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला होणार आहे आणि त्यापूर्वी आम्ही सामन्याची ठिकाणे ठरवू.” यापूर्वी बीसीसीआय आयपीएल स्पर्धेसाठी दोन तारखांचा विचार करत होती. यामध्ये, बोर्डाचे काही अधिकारी आणि काही फ्रँचायझी मालकांना ही लीग 27 मार्चपासून सुरू करायची आहे, तर काही प्रभावशाली मालकांना ही स्पर्धा 2 एप्रिलपासून सुरू करायची आहे.