फलज्योतिषीच झाले त्रिफळाचित!
…तर भारत का जिंकला नाही?
डॉ. ठकसेन गोराणे, प्रधान सचिव, महाराष्ट्र अंनिस
सध्या चालू असलेल्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत दोन दिवसांपूर्वी इंग्लंड विरुद्ध भारत लढतीत भारत नक्की विजय होईल, असे अकरा फलज्योतिषांनी एका वृत्तवाहिनी वरून, एका आवाजात घोषित केले. एवढेच नाही तर, या स्पर्धेचा विश्वचषकही भारतच आणेल, असा दावाही त्यांनी केला.
भारतीय संघ विजयी व्हावा म्हणून अनेकांनी तीर्थक्षेत्री होम, हवन ,यज्ञ अशी दैवी कर्मकांडेही केली. खरंतर,अशा दैवी कर्मकांडानी, तंत्र, मंत्र, पूजा, पाठ ,भविष्यवाणीने खरोखर भारताचा संघ जिंकला असता तर महाराष्ट्र अंनिसलाही आनंद झाला असता .
मात्र प्रत्यक्षात जे घडले ते सर्वांनीच पाहिले .
फल ज्योतिष हे निव्वळ थोतांड आहे, समाजाला पुन्हा पुन्हा मानसिक गुलामीत अडकवण्याचा हा गैरप्रकार आहे,असे अंनिसचे ठाम मत आहे. लोकभावना जेव्हा अधिक तीव्र होतात, अगदी नेमक्या त्याचवेळी फलज्योतिषी अशा लोकभावनांचा गैरफायदा घेऊन, भंपक दावे करतात. लोकही अशा थोतांड गोष्टींवर विश्वास ठेवतात. विज्ञान सृष्टीचा उपभोग घेणारा माणूस वैज्ञानिक दृष्टी का स्वीकारीत नाही ,असा प्रश्न अशा वेळी पुन्हा पुन्हा पडतो.
लोकांनी त्यांच्या समस्येची उत्तरे ही सारासार विवेक बुद्धीने वापरून शोधावीत, म्हणजे त्यांना फलज्योतिषाची गरज भासणार नाही .
सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी नेमके भाकीत वर्तवण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने महाराष्ट्रातील तमाम फलज्योतिषांना वारंवार आव्हान केले होते. पण आजपर्यंत कोणीही फलज्योतिषी महाराष्ट्र अंनिसचे हे आव्हान स्वीकारू शकलेला नाही. कोणत्याही खेळात यश – अपयश येतच असते. खिलाडूवृत्तीने ते स्वीकारायचे असते.
खेळाडूंचे कसब, तंदुरुस्ती, अनुभव,त्यावेळची त्यांची मानसिकता अशा काही गोष्टींवर यश-अपयश अधिक अवलंबून असते. आकाशातील ग्रहगोलांचा अशा गोष्टींशी काहीही संबंध नसतो. मात्र लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, आपला पोटापाण्याचा धंदा अधिक व सतत तेजीत राहावा ,यासाठी फलज्योतिषी अशा मोठ्या संधी बरोबर हेरतात. लोकांच्या गळ्यात अशा भंपक गोष्टी उतरवण्याचा प्रयत्न करतात.
भारतीय क्रिकेट संघ जिंकावा, अशी अंनिसचीही इच्छा होती. पण तो हरला. पण समजा, आपला संघ जिंकला असता तर, फलज्योतिषावरील लोकांचा विश्वास अधिक वाढला असता. फलज्योतिषनांही अधिक स्फुरण आले असते, एवढं मात्र नक्की !! होम, हवन, यज्ञा करून यश मिळते, यावर विश्वास ठेवण्याची लोकांची वृत्ती अधिक वाढली असती. मात्र फलज्योतिषीच त्रिफळाचीत झाले.
म्हणून लोकांनी फलज्योतिषासारख्या थोतांडावर विश्वास ठेवू नये.
विविध खेळांच्या स्पर्धाकाळात फलज्योतिषांच्या भंपक मुलाखती,दावे प्रसारित करण्याऐवजी त्या त्या खेळाशी निगडीत क्रीडामानसशास्त्राचे तज्ञ, सामाजिक शास्त्राचे तज्ञ यांच्या मुलाखती आणि मतं प्रस्तारीत केली तर, लोकांमधील खिलाडूवृत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. प्रत्येक खेळाच्या स्पर्धेकडे लोक खिलाडू वृत्तीने पाहू लागतील.
Indian Cricket Team World Cup Defeat
Superstition