इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट २०२४ विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा मुंबईकर कर्णधार रोहित शर्मा तसेच त्याचे संघातील सहकारी सुर्यकूमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा आज विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, पुष्पगुच्छ, विशेष मानचिन्ह आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले.
विधानभवनात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या विशेष समारंभास विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार ऍड.आशिष शेलार, दोन्ही विधिमंडळातील सदस्य, क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजयश्री खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली असल्याचे सांगत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस बांधवांचे विशेष अभिनंदन
विशेष म्हणजे, काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतावेळी जो प्रचंड जनसमुदाय जमला होता. त्यावेळी गर्दीचे योग्य नियोजन केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. इतक्या मोठ्या गर्दीला नियंत्रण करणे हे मोठे आव्हान होते, तरीही मुंबई पोलिसांनी योग्य नियोजन करीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू दिली नाही हे खरोखर कौतुकास्पद आहे. त्याबद्दल यावेळी मुंबईचे आयुक्त विवेक फणसाळकर आणि सर्व पोलीस बांधवांचे विशेष अभिनंदन केले.