चंद्रपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोल- चिमूरचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर येथे सभा झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, महाविकास आघाडीने अनेक विकास कामाला ब्रेक लावले. त्यांनी राज्याच्या विकासाचा नाही तर स्वतच्या कुटुंबियांचा विकासासाठी काम केले असेही ते म्हणाले. यावेळीस त्यांनी इंडिया आघाडीवरही जोरदार टीका केली.
यावेळी ते म्हणाले की, विदर्भाच्या विकासासाठी मी ज्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केलं त्यालाही या लोकांनी विरोध केला होता. या लोकांनी मराठवाड्याची सिंचन योजना बंद केले. कोकणात रिफायनरी प्रोजेक्ट थांबवला, मुंबईत मेट्रो प्रकल्प रोखला होता, पीएम आवास योजनेसाठी केंद्रातून पैसे आल्यानंतरही त्यांनी गरिबांना घर देणे बंद केलं होते. त्यांचे लक्ष एकच होते, कमिशन आणा किंवा कामावर रोख लावा. आमच्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी या सर्व योजनांना सुरु केले आहे. विकासाचं मोठं काम वेगाने पूर्ण होत आहे असा दावा नरेंद्र मोदींनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करत आहोत. चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-एनडीएच्या मेहनती उमेदवारांना विजयी करण्यासाठी अभूतपूर्व उत्साह असल्याचे म्हटले.