इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
तिसरी निर्णायक कसोटी आणि ऑस्ट्रेलियन संघ
पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाकडून दारूण पराभव, नंतर कर्णधार पीट कमिन्सने व्यक्तिगत कारणांसाठी अर्धवट सोडलेला दौरा आणि डेव्हीड वॉर्नरच्या एल्बोला हेअर फ्रॅक्चर झाल्याने उर्वरीत दौ-यासाठी त्याची नसलेली उपलब्धता, हेझलवुड आणि अॅश्टन अॅगर यांचे मायदेशी परदेशी परतणे…. या सर्व पार्श्वभुमीवर येत्या १ मार्च पासून इंदोरच्या होळकर मैदानावर बॉर्डर-गावस्कर ट्रॅाफी मालिकेतली तिसरी निर्णायक कसोटी सुरू होण्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था म्हणजे “आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचे” या म्हणीतल्या सर्वसामान्य माणसासारखी झाली आहे. यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ क्रीडा समिक्षक जगदीश देवरे..
कोणत्याही पाहुण्या संघाला जगात जर का कुठे टेस्ट खेळायला सर्वाधिक अवघड जात असेल तर ते भारतात. तशातच, रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्वीन ही फिरकी जोडगोळी ढोल इतका सुरात वाजवतेय की त्यांना स्वीप मारावा की प्लेड ऑन करावं, यातच जगातल्या महान संघातील महान फलंदाजांची गफलत होते आहे. नेतृत्व नाही, कुठलाही प्लॅन नाही आणि जिंकण्याची जिद्द हरवलेली…..अशा अवस्थेत यापुर्वी कधीही न दिसलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला आता उरलेल्या दोन कसोटी सामन्यात खेळावे लागणार असल्याने दौ-याचे फलित काय होईल ते देव जाणे.
विराट-रोहीत-चेतेश्वर हे भारतीय फलंदाजीतले त्रिकूट सध्या फार्मात आहे. मधल्या फळीत जाडेजा-अक्षर-अश्विन या अष्टपैलूंची बॅट तळपते आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी यापेक्षा मोठी डोकेदुखी कोणतीच असू शकत नाही. त्यात तांडवनृत्य करायला लावणारी पोषक खेळपट्टी जर जाडेजा-अक्षर-अश्विन या फिरकी त्रयीला मिळाली तर पाहुण्यांचे पुन्हा हाल होणार हे निश्चीत आहे. भारत दौ-यावर येणा-या ऑस्ट्रेलिया संघाला हा अनुभव नविन नाही. गेल्या १० दौ-यांची जर आकडेवारी घेतली तर २००४-०५ चा अपवाद वगळता पाहुण्या संघाला एकाही दौ-यात विजय मिळवता आलेला नाही. परंतु, सध्या या संघाची जी अवस्था आले तितकी वाईट अवस्था या आधी कधी बघायला मिळाली नव्हती. या दौ-यात पहिल्या कसोटीचा निकाल आल्यापासून ऑस्ट्रेलियन मिडीया जाम चवताळलाय.
तिथल्या मातब्बर माजी खेळाडूंची मते मतांतरे तर आश्चर्यचकीत करणारी आहेत. भारत दौरा अर्ध्यावर असतांना या संघाच्या कामगिरीवर याआधी कधीही झाली नव्हती इतकी जहरी टिका होत असल्याने ऑस्ट्रेलियन संघाला बाउन्स बॅक करणे अवघड होवून बसले आहे. परंतु, अशाही परिस्थितीत हा संघ लढवय्या ठरू शकतो हे विसरून चालणार नाही. पहिल्या दोन्ही कसोटीत ऑस्ट्रेलियातर्फे एकट्या स्टीव्ह स्मिथने भारतीय गोलंदाजांसोबत मजबुत संघर्ष केला आहे. आता उर्वरीत दोन कसोटी सामन्यासाठी २९ वर्षीय स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद गेल्यानंतर विजयासाठी स्मिथ किती संघर्ष करतो, याकडे भारतीय संघाला लक्ष ठेवावे लागेल. ऑस्ट्रेलियन संघाचा कुठेही पराभव जिव्हारी लागतो आणि मग त्याला प्रत्युत्तर देतांना ते तितकेच प्रखर होता हा आजवरचा अनुभव असल्याने भारतीय संघाला देखील डोळ्यावर झापड बांधून चालणार नाही किंवा सारं काही आलबेल आहे असं गृहीत धरता येणार नाही.
जागतिक टेस्ट चॅम्पीअनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला हा दौरा अतिशय महत्वाचा होता. नेमक्या याच मोक्याच्या वेळी ऑस्ट्रेलियन संघाची ही वाताहत होणे भारताच्या पथ्यावर पडणार असण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. उर्वरीत दोन कसोटींपैकी एक कसोटी सामना जरी भारतीय संघाने जिंकला तरी जुन २०२३ मध्ये इंग्लडच्या ओव्हल मैदानावर होणा-या आयसीसी टेस्ट चॅम्पीअनशीप अंतिम सामन्याचे दरवाजे भारतीय संघासाठी उघडणार असल्याने आता इंदोरच्या सामन्यात भारतीय संघाने ही सुवर्णसंधी सोडू नये अशा अपेक्षा आहेत.
नागपुर आणि दिल्ली कसोटीचे निकाल हे पहिल्या तीन दिवसात लागले आहेत. आयसीसी रेफरीने आयसीसीला दिलेलया आपल्या रिपोर्ट मध्ये या खेळपट्यांच्या बाबतीत “अॅव्हरेज” असा शेरा नोंदवल्याच्या बातम्या आहेत. घरच्या मैदानावर हे अॅडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न नेहमी होत असतो हे जरी मान्य केले तरी अस्सल कसोटी क्रिकेटच्या भवितव्याचे काय? हा प्रश्न कायम रहातो. या मालिकेनंतर त्यावरही चर्चा झाली तर आश्चर्य वाटणार नाही. तुर्तास, भारतीय संघाला तिस-या किंवा चवथ्या कसोटीत विजय मिळवून जागतिक टेस्ट चॅम्पीअनशीपच्या अंतीम सामन्यात प्रवेश मिळवायचाय, इतकेच!
India Vs Australia Test Match Series Analysis by Jagdish Deore