इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखादे कुटुंब चालवण्यासाठी नवरा – बायको या दोघांचेही योगदान गरजेचे असते. त्यातही अनेकदा बायको पाठीशी उभी राहत असल्याने आपला संसार चांगला झाला, अशी जाहीर कबुली अनेक नवरे देतात. मात्र, अशा प्रकारे बायकोच्या पाठीशी उभे राहणाऱ्या नवऱ्यांना देखील त्रासाला तोंड द्यावे लागते. नुकताच असा एक प्रकार झारखंडमध्ये समोर आला आहे. आपल्या पत्नीला नर्स बनवण्यासाठी एक नवऱ्याने खूप मेहनत घेतली. मात्र, ती बायको मात्र आपल्या नवऱ्याच्या कष्टांची कोणतीही जाण न ठेवता मित्रासोबत पसार झाली.
उत्तर प्रदेशच्या पीसीएस अधिकारी ज्योती मौर्याचे प्रकरण ताजे असतानाच झारखंडच्या साहेबगंजमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील या महिलेने सासरच्यांच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. आणि मग त्यांच्यावरच हुंडा घेतल्याचा आरोप केला. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्याच धर्तीवर झारखंडमध्ये एक प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील एका नवऱ्याने दावा केला आहे की त्याने आपल्या पत्नीला नर्स होण्यासाठी खूप कष्ट घेतले. तिच्या शिक्षणासाठी त्याने कर्ज घेतलं. एवढंच नव्हे तर कर्ज फेडण्यासाठी त्याने मजुरीही केली. आता पत्नी चांगल्या ठिकाणी नोकरीला लागल्यानंतर तिने १४ वर्षांचा संसार मोडत पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी दुसऱ्या तरुणासोबत १४ एप्रिलपासून फरार आहे.
साहेबगंजच्या बांझी बाजारमध्ये राहणाऱ्या कन्हाई पंडितचं लग्न कल्पना देवी हिच्याशी १४ वर्षांपूर्वी झालं. कल्पना ही बोरियो ब्लॉक परिसरातील तेलो गावची रहिवासी आहे. लग्नानंतर तिने पतीकडे अभ्यासाचा हट्ट धरायला सुरुवात केली. पत्नीच्या आग्रहानंतर त्याने जमशेदपूरच्या नर्सिंग कॉलेजमध्ये एएनएमचे शिक्षण घेण्याची तरतूद केली. पत्नीला शिकवण्यासाठी सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचं पतीने सांगितले. त्यानंतर त्याची पत्नी साहिबगंजमधील जुमावती नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून काम करू लागली. हे कर्ज फेडण्यासाठी तो गुजरातला गेला होता. तेथे तो दोन वर्षांहून अधिक काळ राहिला.
विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात त्याला घरी यायचे होते. मात्र, तेव्हाही पत्नीने त्याला परतून येण्यास नकार दिला आणि केवळ पैसे पाठवण्यास सांगितले. तेव्हाही तिचे म्हणणे मान्य करून तो तिथेच राहिला. जेव्हा तो परतून येथे आला, तेव्हा त्याला त्याच्या पत्नीचे वागणे बदललेले दिसले. ड्युटीच्या नावाखाली ती अनेकदा रात्रंदिवस घराबाहेर राहायची. पत्नीनेही त्याच्यासोबत होळी साजरी केली नाही.
पत्नीचे वागणे पाहून त्याला हळूहळू शंका आली. पत्नी १० वर्षांच्या मुलासोबत तिच्या माहेरी गेली आणि तिच्याशी शेवटचं बोलणं १४ एप्रिल रोजी झालं. पत्नीशी बोलणं होत नसल्याने तो त्याच्या सासरी गेला. तिथे त्याला सासू-सासऱ्यांचा स्वभावही बदललेला दिसला. त्यामुळे त्याचा संशय अधिकच बळावला. त्याची पत्नी एका तरुणासह पळून गेल्याची चर्चा आहे.