हैदराबाद – पती पत्नीचे भांडण हे काही कुणी मनावर घ्यायचे नसते, विशेषतः त्या दोघांनी तरी मनावर घेऊ नये, कारण या भांडणाचा शेवट हा कडू नव्हे तर गोड होतो. पण काही वेळा वाद टोकाला जातात आणि विपरित प्रसंग घडतो. आंध्र प्रदेशातील हैदराबादमध्ये एका ३६ वर्षीय महिलेने केवळ या क्षुल्लक गोष्टीवरून पतीसोबत भांडण झाले. म्हणून चक्क गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांच्या भांडणाचा शेवट खूप वेदनादायी होता, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनेची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका महिलेचा पती हा व्यवसायाने शिंपी आहे. त्यामुळे महिलेने पतीला ब्लाउजची शिलाई करण्यास सांगितले, परंतु ब्लाउज शिवल्यावर ते आवडत नसल्याने तिने पतीला तिच्या सूचनेनुसार तिच्या ब्लाउजची शिलाई सुधारावी अशी इच्छा व्यक्त केली. पण नवऱ्याने तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे या मुद्द्यावरून सुरुवातीला दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली, त्याचे हळूहळू हाणामारीत रूपांतर झाले. यादरम्यान महिलेलाही दुखापत झाली.
यानंतर महिला तिच्या खोलीत गेली आणि आतून दरवाजा बंद केला, बराच वेळ ती बाहेर न आल्याने दरवाजा तोडण्यात आला. मात्र खोलीत गेले असता ती फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. खोलीतून सुसाइड नोट सापडली नाही. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस तपास करत आहेत.