वज्रलेप / मूर्तीसंवर्धन योग्य आहे का?
प्राचीन काळी काय पद्धत होती?
घ्या जाणून सविस्तर…
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या देवी सप्तश्रृंगीच्या मूर्ती संवर्धनाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. तर इकडे, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भगवान त्र्यंबकेश्वराच्या पिंडीची मोठी झीज झाल्याची बाब समोर आली आहे. आता या पिंडीला पुन्हा वज्रलेप करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर वज्रलेप / मूर्तीसंवर्धन योग्य आहे का? प्राचीन काळी काय पद्धत होती? सध्याची पद्धत शास्त्रोक्त आहे का? आदींचा उहापोह करणारा हा विशेष लेख….
आपले भगवंत, परमेश्वर खरे म्हणजे स्थल-काळातीत आणि निर्गुण-निराकार आहेत. ते आकारात असतात आणि आकारांच्याही पलीकडे असतात. आपले मनुष्याचे मन, जगणे, सर्वच अस्तित्त्व मात्र काळ आणि रूपात म्हणजे आकारात जगत असते. म्हणूनच ‘त्या’ निराकार परमेश्वराला मानवाने आकार दिला. आपल्या देवघरापासून मंदिरात आणि गिरिकुहरात त्याला स्थल-बद्ध (विराजमान) केले. त्यामुळे आता आपल्याला सर्वत्र दिसतात ते मूर्तींचे आकार हे त्या त्या काळातील द्रष्ट्या ऋषीच्या ‘साक्षात्कार आणि दर्शना’प्रमाणे (दृष्टांताप्रमाणे) सजले. ते अस्त्र-शस्त्राने सज्ज झाले. अर्थात ही अस्त्र-शस्त्र म्हणजे विविध देवतांच्या तेजाचे आविष्करण आहेत. अशाप्रकारेच कोटी कोटी विग्रह (मूर्ती) प्रकट झाले अथवा मानवी सौंदर्य दृष्टीने त्यांना घडविले…
भक्तांच्या उपासनेसाठी साहाय्य म्हणून मंत्रद्रष्ट्या ऋषिनी त्याला मंत्र आणि स्पंदनांची जोड दिली आणि पुढे कर्मकांडनिष्णातानी त्यांच्या पूजा पद्धती विकसित केल्या. हळूहळू त्यांना शास्त्र, संहिता, स्मृति चे स्वरूप आले. काळ पुढे सरकला. आणि परंपरा सुरू झाल्या. उपासनेसाठी घडविण्यात आलेल्या अथवा स्वयंभू मूर्ति म्हणजे विग्रहाचे आकार परिणामी हळूहळू बदलू लागले. तो आकार तसाच ठेवावा अथवा त्यांचे संवर्धन करावे असे पर्याय पुढे आले.
प्राचीन मूर्तिसंवर्धन क्षेत्रात आज खूप मोठी क्रांती झाली आहे. त्याचेच साहाय्य घेऊन आणि शेंदूरामुळे तयार झालेले पटल (कवच) काढून मूळ मूर्तीचे संवर्धन करण्यात आले आहे. देशात हीच प्राचीन आणि आधुनिक पद्धत वापरली जाते.
वज्रलेप का करतात
मूलतः ‘वज्रलेप’ (प्रस्तराला लेप देणे) आणि ‘कवच’ या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. साक्षात दिव्यत्व धारण केलेल्या पण भक्तांसाठी पार्थिव रूप घेऊन प्रकटलेल्या स्वयंभू मूर्तीवर वज्रलेप केला जातो. आपल्या परंपरेत श्रीहनुमंत, देवींचा तांदळा आणि उपदेवता यांना शेंदूर लेपन केले जाते. विविध औषधी आणि जडीबुटी वापरून त्याचे जतन कसे करावे आणि येणाऱ्या हजार हजार पिढ्यांसाठी साक्षात स्वयंभू, पण प्रकट झालेल्या मूर्तींचे रक्षण व संवर्धन कसे केले जावे, ही विशेष कला व विद्या आमच्या ऋषि मुनींना ज्ञात होती. पण नेहमीप्रमाणे काही मोजक्या जणांना ज्ञात असलेली विद्या लुप्त पावली. परचक्र आली आणि नंतर भंगलेल्या मूर्ती पूर्ववत करण्यासाठी कवचाची गरज भासू लागली. मग ते कवच शेंदूराचे असो, गोमयाचे असो, मृत्तिकेचे असो वा सोने-चांदी आदी धातूंचे असो; ते करण्यात आले. (मृत्तिका लेपन केलेल्या अनेक प्राचीन मूर्ती पुरातत्व विभागाला आढळल्या आहेत.)
गीतेतील “वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।” (मनुष्य जुनी वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करतो…) हा भगवंतानी केलेला उपदेश केवळ मानवापुरताच मर्यादित नाही. तर भक्तांसाठी पार्थिव देह धारण केलेल्या स्वयंभू मूर्तींनाही तो लागू पडतो. म्हणूनच कालांतराने मूर्तींच्या संवर्धनासाठी नैसर्गिक वनौषधी, शेंदूरसारख्या वस्तूंच्या उपयोगास सुरुवात झाली. पुढे अर्वाचीन संत आणि विद्वानांनी शेंदूर लेपनाचा, पूजा उपचारात समावेश केला. मात्र शेवटी ती पाषाणात प्रगटलेली मूर्तीच आहे. शतकनुशतके १००० – १००० किलो शेंदूर ती कोठपर्यंत धारण करणार?
अशावेळी वर्षानुवर्षे लुप्त झालेली वज्रलेपाची कला आज भारतातील सश्रध्द शास्त्रज्ञांनी शोधून काढली. आणि पुढे आज याचीच गरज भासू लागली आहे. हे वज्रलेप भक्तांच्या कल्याण्यासाठी आवश्यक होते. आज हे कवच काढल्यानंतर स्वयंभू मूर्ती प्रकट होणे आणि तिचे दर्शन हा सश्रध्द भाविकांसाठी ‘अमृत योगच’ आहे.
आता प्रश्न मंदिर बंद ठेवण्याचा अन् काही काळ पूजा थांबविण्याचा येतो. शिवाय सोवळेओवळे आहेच. मूलतः या स्वयंभू मूर्तींचा आढळ झाला तेव्हा त्यांची पूजा अर्चना निसर्गच तर करीत होता. गाई यायच्या आणि ज्योतिर्लिंगावर अभिषेक करायच्या. वृक्ष आपली पाने-फुले अर्पण करायची. आकाश पर्जन्याचा वर्षाव करायचा…. पुढे साक्षात्कारी महापुरुषांना दृष्टांत झाले आणि अव्यक्त देवता व्यक्त झाल्या. येथेच मानवी प्रज्ञेप्रमाणे (बुद्धी) पूजा अर्चनांना व पुढे कर्मकांडाला प्रारंभ झाला. यातून विविध पूजा संप्रदाय आले, काटेकोरपणा आला, कट्टरपणाही आला. म्हणूनच शास्त्रांचा साद्यंत अभ्यास केलेले विद्वान वगळता अन्य जनांनी ‘वज्रलेपनास विरोध केला’. तर काहींनी ‘मूर्तीचा आकार बदलला’ अशी कुजबूज सुरू केली, आवई उठवली. काही जण तर सांगू लागले की, आमचा अभ्यास असे सांगतो, ‘स्वयंभू मूर्ती भंगली तरी दोष नसतो.’ दुर्दैव म्हणजे येणाऱ्या हजार वर्षात पुढील पिढ्यांसाठी आपल्याला स्वयंभू असलेल्या पण पार्थिव मूर्तीचा सांभाळ करायचा की नाही यांचा विचार काही कर्मठ मंडळी करीतच नाहीत!
यापूर्वीही भारतात आणि महाराष्ट्रातही महिलांच्या ‘मंदिर गर्भगृह’ प्रवेशावरून विरोध झाला आहे. ज्या बाबी धर्मशास्त्रानी आणि धर्मसभेने सोडवायच्या त्या थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्या. आणि ‘सद्सद्विवेका’ची जागा ‘आदेशांनी’ घेतली. आम्ही हे आदेश मात्र निमूटपणे ऐकू लागलो. खरे तर असे कुठलेही विरोध मनात न बाळगता आणि परस्परांविषयी कुठलेही अभिनिवेश न बाळगता सामोपचाराने हे प्रसंग सोडविता येऊ शकतात.
तज्ञ आणि महात्म्यांनाही विरोध!
दुसरा मुद्दा, मूर्ती अथवा ज्योतिर्लिंगाच्या सांभाळाचा. भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी म्हणजे ‘सरकारी कर्मचारीच ते!’ म्हणत त्यांची हेटाळणी करू नये. तेही मंदिर, मूर्तिकला आणि शिल्पशास्त्रात निष्णात असतात. कोणत्याही मंदिर वा देवदेवतांचे संवर्धन आणि संरक्षणाचे काम हाती घेण्यापूर्वी ते, या क्षेत्रातील प्रकांड विद्वान आणि धर्मशास्त्र-तत्त्वज्ञानाचे अभ्यासक तसेच देशातील कर्मकांडनिष्णात यांच्याशी, दीर्घ संवाद करीत असतात. अशावेळी त्यांच्या कार्यावर बोट ठेवण्याला काय म्हणावे?
त्र्यंबकेश्वराला १९९१ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात बडा उदासीन आखाड्याचे महामंडलेश्वर आणि वृंदावन-रमणरेती आश्रमाचे महात्मा कार्श्नि गुरु शरणानंद महाराज यांचे वास्तव्य होते. ते संपूर्ण श्रावण महिन्यात रोज पहाटे २-३० ते ३-३० ज्योतिर्लिंगावर महाअभिषेक करीत. स्वतः उच्च साधक आणि बनारस विश्वविद्यालयातील पीएच.डी. प्राप्त असल्याने अनेक शास्त्र-कलांमध्ये निष्णात आहेत. पवित्र स्वयंभू शिवपिंडीची झीज त्यांच्या लक्षात आली. १९९४ मध्ये पुन्हा येऊन त्यांनी चांदीचे कवच अर्पण केले… त्याची ‘आवश्यकता’ त्यांनी संबंधितांना लक्षात आणून दिली. पण दुर्दैव म्हणावे की काय, त्या चांदीच्या कवचाचा ‘स्पष्ट’ अस्वीकार करण्यात आला. कारणे अनेक सांगितली जातील पण, आज ४० वर्षांनंतरही आम्ही संवर्धनासाठी काहीच ठोस अशी पावले उचललीच नाहीत!
पूजाद्रव्य आणि विक्रम!
आणखी एक विषय पूजाद्रव्यांचा. आज सगळीकडेच मूर्तींची पूजाअर्चा करतांना केमिकलयुक्त पूजा साहित्य उपयोगात आणले जाते. जेथे चंदन-गंधाचा एक टिळा पुरेसा असतो तेथे ‘मळवट’ भरल्याप्रमाणे अथवा कुंकुवाच्या जागी ‘रंगपंचमी’ साजरी केली जाते. घरचे अन् गाईच्या दुग्धाचे ताजे दही उपयोगात आणण्याऐवजी ‘तयार’ दही वापरले जाते. कुंकू-चंदना बाबत तर बोलायलाच नको. यामुळे भारतातील लाखो माताभगिनींच्या कपाळावरील अलर्जी त्यांना जन्मभर मिरवावी लागत आहे. माणसांसाठी डॉक्टर तरी आहे पण आमच्या ‘बिचाऱ्या देवाला’ हे निमूटपणे सहन करावे लागते!
देवता व मूर्तीबाबत पुरातत्व विभागाने सावध करूनही आम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. दुसरीकडे २१०० लिटर्स दूध(!), काही क्विंटल भस्म आणि लक्षावधी रुद्राक्ष वाहण्याचा विक्रम(!!) काही महाभाग करीत असतात. त्यांची उपासना आकड्यांवर ठरते! पण यातून भक्ती प्रकट होत नसते… फक्त वाढतो तो आपण कसे वेगळे आहोत हा अभिमान. यामुळे मूर्तीला हानी पोहोचते याचे भानही यांना नसते. आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी अनेकवेळा केदारनाथ आणि विश्वनाथाला अभिषेक करतात. पण त्यांनी एवढे दूध, भस्म, रुद्राक्ष अर्पण केल्याचे पाहण्यात नाही.
शास्त्रार्थातील विरोधाभास, तर्क-वितर्क यामुळे सामान्य भक्तांच्या मनात संभ्रमाची वारुळे तयार करू नयेत ही कळकळीची विनंती… ‘दोन हात आणि एक मस्तक’ अशी साधी भोळी भक्ती अन् निष्ठा ते बाळगतात आणि जपतात. शेवटी एक प्रार्थना दोन अडीच वर्षांच्या वैश्विक करोना संकटाने सर्वच धर्म आणि संप्रदायात स्थापित विधि-विधाने बदलली. जो तो ईश्वराला घरातच पूजू लागला. आचारधर्मात लुप्त झालेली मानसपूजा पुन्हा सुरू झाली. कारण जो-तो स्वतःचा जीव वाचविण्याच्या खटपटीत व लगबगीत होता आणि आजही आहे. त्याकाळात मंदिरं बंद होती आणि पूजाही. प्रत्येक सश्रध्दाने ते दिवस आठवून आता होणाऱ्या वज्रलेप आणि कवचाला आज आणि पुढेही विरोध करू नये ही आदिमाया आणि आदिनाथाच्या श्रीचरणी प्रार्थना.
– अशोक ताम्हणकर, पुणे
Historic God Idol Conservation Protection Technique Tradition
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/