इंदूर (मध्य प्रदेश) – येथील बाणगंगा पोलिस ठाणे क्षेत्रात झालेल्या दुर्घटनेत चार वर्षांच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिवाळीनिमित्त कुटुंबीयांनी घराच्या छतावर तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला होता. त्या दिव्याशी खेळताना लहान मुलीच्या फ्रॉकने पेट घेतला. गंभीर अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा धक्का बसल्याने मुलीच्या आजोबांचाही मृत्यू झाला आहे.
मुलीचे काका सुनील निसाड यांच्या माहितीनुसार, श्रुती जितेंद्र निसाड (रा. महेश यादव नगर) असे मुलीचे नाव आहे. श्रुतीचे वडील प्लॅस्टिकच्या कारखान्यात काम करतात. तिची आईसुद्धा सायंकाळी कामावर गेली होती. घरी श्रुतीचे आजोबा झोपले होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास श्रुती छतावरील तुळशीच्या रोपाजवळ लावलेल्या दिव्यासोबत खेळत होती. त्यादरम्यान तिच्या फ्रॉकने पेट घेतला. ती आरडाओरडा करत आजोबांकडे धावत गेली. ती किंचाळत म्हणाली, आजोबा मी जळत आहे माझ्यावर पाणी टाका. झोपेतून उठून आजोबांनी तिच्यावर पाणी टाकले आणि आग विझविली.
कुटुंबीयांनी श्रुतीला खासगी रुग्णालयात नेले असता तिथून त्यांना एमवाय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथे तिने पोलिसांना जबाबही दिला. दिव्यासोबत खेळताना कपड्यांना आग लागली तेव्हा छतावरील नळ सुरू करण्याचा तिने प्रयत्न केला. मात्र नळापर्यंत हात पोहोचू शकला नाही. त्यानंतर ती आजोबांकडे गेली, असा जबाब तिने पोलिसांना दिला. सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ९५ टक्के भाजलेल्या श्रुतीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून पोलिसांनी कुटुंबीयांना मृतदेह सोपवला.
नातीच्या मृत्यूने आजोबांना धक्का
श्रुतीचे आजोबा भागचंद यांच्यासमोरच ही सर्व घटना घडली होती. जळालेल्या अवस्थेत श्रुती त्यांच्यासमोर आली होती. माझ्यावर पाणी टाकून आग विझवा असे श्रुती सारखे म्हणत होती. आजोबांनी पाणी टाकून आग विझविली आणि तिचे कपडे काढले. घराच्या खाली श्रुतीचा भाऊ गतिक आणि श्रुतीच्या मावशीचे मुले कार्तिक आणि कृतिका हे सुद्धा खाली खेळत होते. दोघेही पळत वर आल्यानंतर त्यांनी शेजार्यांना आवाज दिला आणि तिला रुग्णालयात दाखल केले. रात्री श्रुतीचा मृत्यू झाला. आजोबा घरीच होते. सायंकाळी श्रुतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आजोबांची तब्येत बिघडली आणि श्वास लागला. काही वेळानंतर आजोबांचाही मृत्यू झाला.