नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अमरनाथ यात्रेसाठी ड्युटीवर जाणाऱ्या बीएसएफच्या बाराशे जवानांनी ट्रेनची वाईट अवस्था पाहून त्यात चढण्यास नकार दिला. रेल्वे मंत्रालयाने या पाच दिवस जुन्या प्रकरणात चार रेल्वे अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
६ जून रोजी सैनिकांना त्रिपुराहून अमरनाथला जायचे होते. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे (एनएफआर) कडून सैनिकांना पुरवण्यात आलेल्या ट्रेनच्या खिडक्या आणि दरवाजे तुटलेले होते. ट्रेनचा व्हिडीओही आता समोर आला आहे. त्यातील शौचालय तुटलेले आहे, लाईट नाही. सीटवरील गाद्याही गायब आहेत. जमिनीवर झुरळे दिसत आहेत. सैनिकांनी नकार दिल्यानंतर १० जून रोजी दुसरी ट्रेन उपलब्ध करून देण्यात आली.
अमरनाथ यात्रेकरूंच्या कर्तव्यासाठी सैनिकांना काश्मीरला पोहोचायचे होते. ज्या ट्रेनने त्यांना प्रवास करायचा होता, त्याची तपासणी बीएसएफ कंपनी कमांडरने केली. ट्रेनची स्थिती पाहून त्यांना धक्का बसला. रेल्वेच्या डब्यांची अवस्था खूपच वाईट होती. सैनिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्यांचा वापर करता येत नव्हता. तपासणीनंतर असे आढळून आले, की डबे अनेक महिन्यांपासून वापरले गेले नव्हते. प्रत्येक डब्यात तुटलेल्या वस्तू पडलेल्या होत्या. ट्रेनच्या खिडक्या आणि दारांना छिद्रे होती. बहुतेक सीट मातीने माखलेले होते. ट्रेनच्या अनेक डब्यांमध्ये बल्ब किंवा वीज नव्हती.
भारतीय रेल्वेच्या एनएफआर झोनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की सहा जून रोजी निघणारी ट्रेन रद्द करण्यात आली आहे. कारण ‘बीएसएफ’ने ट्रेनमधील त्रुटींवर तीव्र आक्षेप घेतला होता. यामुळे आता त्यांना दुसरी ट्रेन देण्यात आली आहे. मंगळवारी नवीन ट्रेन रवाना करण्यात आली.