जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) “घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे…”, “नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय…”, “कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही…” अशा अनेक वेदना आणि व्यथा महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक ‘एल्डर लाईन १४५६७’ या राष्ट्रीय हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडत आहेत. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था यांच्या सहकार्याने व राज्य शासनाच्या सहभागातून ही मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात जनसेवा फाउंडेशन, पुणे या संस्थेमार्फत ऑगस्ट २०२१ पासून ‘एल्डर लाईन’ सेवा राबविण्यात येत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा (MD) यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३७ वर्षे जनसेवा फाउंडेशन सामाजिक सेवेत कार्यरत असून, त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे.
सुरुवातीपासून आजपर्यंत या टोल-फ्री क्रमांकावर (१४५६७) महाराष्ट्रातून ४ लाखांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर मदत करण्यात आली आहे. वयोवृद्धांच्या भावनिक, सामाजिक, कायदेशीर आणि आरोग्यविषयक गरजांकरिता ही सेवा प्रभावी ठरली आहे.
हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या प्रमुख मोफत सेवा:
माहिती: आरोग्य, पोषण, निवारा, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर इत्यादींबाबत आवश्यक माहिती.
मार्गदर्शन: कायदेविषयक सल्ला, मालमत्ता व कौटुंबिक वाद, पेन्शन योजना व ज्येष्ठ नागरिक कल्याण अधिनियम २००७ अंतर्गत मदत.
भावनिक आधार: मानसिक ताण, चिंता, राग यावर समुपदेशन व व्यावसायिक मदत.
पुनर्वसन व समन्वय: बेघर, अत्याचारग्रस्त वृद्धांची मदत, कुटुंबाशी संवाद, पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय.
“एल्डर लाईन १४५६७” ही सेवा केवळ हेल्पलाइन नसून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार ठरत आहे. वयोवृद्धांना सन्मानाने आणि सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी ही सेवा सातत्याने कार्यरत आहे.
राज्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमाबाबत जागरूक व्हावे आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना या सेवेचा लाभ घेण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.