इंडिया दर्पण विशेष लेखमाला
व्यथा आदिवासींच्या – भाग १४
“शिक्षित आदिवासींची अनास्था”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या वंचित समजातून पुढे आले त्या समाजाच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांनी तहहयात परिश्रम घेतले. असेच बाबासाहेब आदिवासी तरुणांमधून निर्माण होण्याची मोठी गरज आहे ही गोष्ट आता आदिवासी पाड्यांकडे पाहिल्यावर लक्षात येते.
नाशिक जिल्ह्यातील हरसूलच्या पुढे गेल्यावर साबरबारी, ठाणापाडा, हळवेरपाडा, कोटंबी गाव, चामीनमाळ या परिसरातून पुढं गेलं की समोर हिरव्या रंगाची अतिशय नेटकी घरं दिसतात आणि पुढं गेल्यावर डोंगर. विहिरीतून पाणी काढताना बाया दिसतात. भरपूर पाऊस असलेल्या या भागातलं पाणी मात्र वाहून जातं. त्यामुळं पावसाळा संपल्यावर पाण्याचं दुर्भिक्ष्यच ! भात, नाचणी, वरई यापलिकडे काही रानभाज्याच मिळतात इथं. हिवाळ्यात गावातली कष्ट करू शकणारी मोठी माणसं रोजगारासाठी नाशिक, नगर जिल्ह्यात इतरत्र स्थलांतर करताना दिसतात. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या हिवाळी गावात रस्ताही संपतो. पुढं आडवा डोंगर आहे. भौगोलिक स्थान, स्थानिक परिस्थिती व नैसर्गिक अडथळ्यांची जाणीव इथे पोहोचताना प्रकर्षाने होते. या गावात पिण्याचं पाणी नाही म्हणून पाहणी करायला तिनेक वर्षांपूर्वी इथे गेलो होतो. पुढे सर्व सोपस्कार पार पाडून या गावाला आमच्या सोशल नेटवर्किंग फोरमने पाणी मिळवून दिले. पण याहीपेक्षा मला भावली इथली शाळा. इथे मला भेटला एक तरुण शिक्षक.
अलिकडच्या गावातील ठाणापाडा गावचा एक आदिवासी तरूण प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावातच घेऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी नाशिकला जातो. तेथील महाविद्यालयातून डीएड केल्यावर शहराच्या सुखसोयी, झगमगाटात न रमता वाटेवर असंख्य काटे असलेली गावाकडची वाट धरतो. मुलांच्या आणि पर्यायानं गावाच्या विकासासाठी शिक्षकी पेशा स्वीकारून गावांचं रुपडं बदलायचं ठरवतो. केशव गावीत हे त्या तरूण शिक्षकाचं नाव. आज या शाळेचं आणि गावित सरांचं नाव सर्वदूर पोहोचलंय ते त्यांनी केलेल्या असामान्य कार्यामुळं ! एक सुशिक्षित आदिवासी तरूण शिक्षक शाळेचा कायापालट घडवण्याबरोबरच गावाच्या समस्या सोडवण्याचाही प्रयत्न करतो, त्याचं काम तो करत असतो तेव्हा सगळ्या जगाचं लक्ष त्या नकाशावरही नसलेल्या गावाकडं जातं. ही सक्सेस स्टोरी सांगण्याचा उद्देश हा आ हे की आज आदिवासी भागातून शिकून पुढे आलेले किती लोक आपल्या गावांसाठी, ज्या वंचित समाजातून आपण पुढे आलो आहोत त्या समाजाच्या भल्यासाठी काहीतरी काम करत आहेत?
जागतिक आदिवासी लोकसंख्येपैकी २३ टक्के आदिवासी भारतात आहेत. ४६१ आदिवासी जमाती येथे राहतात. वेगवेगळ्या प्रांतातल्या आदिवासींची बोली, भाषा, देव, कर्मकांडं, वेगळी असली तरी प्रतिकूल परिस्थितीचा समान धागा त्यांच्यात आहे. घरात कमालीची गरिबी, व्यसनी आई-वडील, अन्नधान्याची कमतरता, मूलभूत सुविधांसाठी असणारा झगडा, जंगलाशी असलेलं नातं, जंगलावरील अवलंबित्व, वनजमिनींचे प्रश्न, अनारोग्य आणि सरकारने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सुरू केलेल्या सरकारी शाळांमुळे डोंगरवाटा तुडवत चालत चालत शाळेची धरलेली वाट… यातील अनेक मुलांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणात भरारी घेतली आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत उच्च शिक्षण घेतलं. उच्चशिक्षणासाठी शहरात, तालुक्याच्या ठिकाणी गेल्यावर राहणीमान, बोलीभाषा यांमुळे प्रस्थापितांचे ऐकावे लागलेले टोमणे, मानसिक-आर्थिक पातळीवर झुंज देत आयुष्यात काही मिळवणं, खरंच ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे; पण हे करत असताना ही मुलं कमावती झाल्यावर शहरांमध्ये, तिथल्या वातावरणात इतकी रमली की त्यांच्या बालपणीच्या ‘सुखाच्या’ नसलेल्या गावाला ती विसरली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.
शहरातलं आयुष्य सोडून या दुर्गम भागात खासगी प्रॅक्टिस करायला डॉक्टर तसे नाखुशच असतात. एका मोठ्या शहरातील डॉक्टरांचे क्लिनिक! डॉक्टर हुशार आणि नावाजलेले! हे डॉक्टरही एकेकाळी आदिवासी पाड्याचाच एक भाग होते. लहानपणी आपल्या मित्रांबरोबर आजूबाजूचा डोंगराळ परिसर पालथा घातलेले, तीन तीन किलोमीटर चालत शाळेत गेलेले, एक वेळच्या जेवणाची भ्रांत; जिद्दीने कष्टाने डॉक्टर झाले. पण त्यांनी आपली सेवा शहरातच द्यायचे पसंत केले. शहराच्या महासागराचा ते एक भाग झाले. काही काळानंतर ते आपले लहानपण, पूर्वायुष्य जणू विसरूनच गेले. खरेतर या हुशार डॉक्टरांची त्यांच्या परिसरातील आरोग्याची परिस्थिती सुधारण्यास मदतच झाली असती, पण तसे झाले नाही. शहरी सुखासीन आयुष्य सोडून या दुर्गम भागात कोण प्रॅक्टिस करणार? आपलं नीट चाललंय ना, मग कशाला पुन्हा त्या दरिद्री गावची वाट धरा! या डॉक्टरांचा गाव अजून सुधारलेला नाही. इथला आदिवासी अजूनही असंख्य प्रश्नांच्या जाळ्यात पुरता अडकलेला आहे.
आपल्या आजूबाजूला आदिवासी जाती-जमातींमधील उच्चशिक्षण घेतलेले अनेकजण दिसतील, पण फार क्वचितच हे लोक वळून माघारी आपल्या पाड्यांच्या विकासासाठी परतलेले पाहायला मिळतील. आजघडीला आदिवासी भागातून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आयएएस अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनिअर, प्राध्यापक, सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्या पदावर काम करणारे लोक आहेत. पण एकदा शहराचा चकचकीतपणा भुरळ घालायला लागला की ही मंडळी आपल्याच गावाला, गावकऱ्यांना विसरताना दिसतात. भारतात ब्रिटिश आले तेव्हा ब्रिटिशांच्या जुलमी शासनाविरोधात लढा देणारे, आपल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारे शहाणेसुरते लोक आदिवासी बांधवच होते. त्यांच्यातलेच एक होते.
आदिवासी क्रांतिकारी, समाज सुधारक यांनी आपल्या बांधवांना आपले अधिकार जपत शहाणं करण्याचा प्रयत्न केला. जंगलावर आधारित संस्कृतीतलं निसर्ग व मानव सहजीवन जपण्याचा प्रयत्न केला. क्रांतिवीर राघोजी भांगरे, राणी दुर्गावती, तंटया भिल्ल, राजे यशवंतराव मुकणे,बाबुराव शेडमाके, भागोजी नाईक,बिरसा मुंडा, खाज्या नाईक, नाग्या कातकरी…अशी किती नावं घ्यावीत? एकोणिसाव्या शतकापर्यंत सजग आदिवासी तरूण आपल्या बिरादरीच्या हक्कांसाठी लढताना दिसत होता. नंतरच्या काळात काही अपवाद वगळता असे चित्र दिसत नाही. आता उच्चशिक्षित आदिवासी बांधव मात्र आपलाच हा इतिहास विसरताना दिसत आहेत.
आदिवासींनी ज्या ब्रिटिशांच्या जुलूमशाहीच्या विरोधात उठाव केले, त्याच ब्रिटिशांनी भारतात आधुनिक शिक्षण आणलं. एकीकडे सत्ता लादणारे, छळ करणारे ब्रिटिश होते, तर दुसरीकडं शिक्षण, सुधारणा, समानता यांची दिशा दाखवणारे काहीजण इंग्रजच होते. देश स्वतंत्र झाल्यावर घटनेने सर्वांना शिक्षणाचा हक्क दिला. शिक्षणाच्या प्रवाहात डावलल्या गेलेल्या आदिवासींना रंग, वंश, दर्जा, वर्ग, लिंग यामुळे त्रास सहन करावा लागू नये म्हणून भारतीय राज्यघटनेने त्यांना संरक्षण दिले, सवलती दिल्या, संधी उपलब्ध करून दिल्या. आदिवासी मुलांनी शिकलं पाहिजे, सुजाण नागरिक होऊन आपल्या हक्कांविषयी सजग झालं पाहिजे, त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, यासाठी कितीतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी आदिवासी पाड्यांवर जाऊन शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली.
आदिवासी भागातील गरिबीचा निर्देशांक पाहिला तर परिस्थिती लक्षात येते. जगातील आदिवासींची आकडेवारी पाहता, एकूण आदिवासी लोकसंख्येपैकी २३ टक्के आदिवासी भारतात आहेत. ९ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर झालेल्या वार्षिक मानव विकास निर्देशांकात म्हटले आहे की, गरिबीच्या बाबतीत भारत १८९ देशांमध्ये १२९ व्या क्रमांकावर आहे. भारतात अजूनही ३६४ दशलक्ष गरीब राहतात. हे प्रमाण एकूण गरीब लोकसंख्येच्या २८ टक्के आहे. जगात गरिबांची संख्या अंदाजे १३० कोटी आहे. भारतामध्ये एकूण ४६१ आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. देशातील तब्बल ४५ टक्के आदिवासी दारिद्र्यरेषेखाली आहेत. बालविवाह, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येणारे अडथळे… असे असंख्य प्रश्न आदिवासी समाजातील मुलांचे आहेत. या मुलांच्या परिस्थितीवर काम करण्यासाठी पालकांना समजावून सांगण्याबरोबरच त्यांच्यासाठी रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी निर्माण करणे, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे, कुटुंबनियोजनाचे महत्त्व त्यांना पटवून देणे, त्यांच्या होणाऱ्या शोषणाबाबत त्यांच्यात जाणीवजागृती निर्माण करणे. अशा अनेक आव्हानांवर प्रबोधन करणे शिक्षेत आदिवासींना सहज शक्य आहे पण तसे होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे.
तरूणांचे प्रश्न आणखी वेगळे आहेत. विविध प्रकारची व्यसने… या व्यसनांमध्ये क्रिकेटचाही समावेश करावा लागेल. आपल्याच गावातल्या प्रश्नांबद्दल संवेदनशीलता नसणे, इंटरनेटवरील फिजूल गोष्टी आणि स्थानिक नेत्यांच्या आहारी जाणे… या सगळ्या बाबींचा विचार करता या तरूणांना दिशादर्शकाची गरज आहे. आपल्या मातीतली ही गरज फक्त तिथलेच लोक अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात. गावच्या तरूणांना आपलं शिक्षण-उद्योगधंदे सोडून क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र आणण्यापेक्षा चांगल्या रस्त्यांची मागणी करायला एकत्र आणलं तर…पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तरूणांनी आवाज उठवला तर… स्थानिक नेतृत्वाला एकत्रित जाब विचारण्याची क्षमता त्यांच्यात आली तर… हा बदल किती चांगला असेल. सुशिक्षित, उच्चशिक्षित आदिवासी लोकांनी ठरवलं तर आदिवासी समाजाला एक दिशा मिळेल. मध्यंतरी एक बातमी वाचनात आली, ती म्हणजे वर्धा येथील एका सुशिक्षित आदिवासी जोडप्याने आपल्या लग्नात डीजे लावण्याऐवजी गोंडी पारंपरिक गाण्यावर नृत्य केलं. आपली संस्कृती टिकवणे आणि जगासमोर आणणे यासाठी ही चांगली धडपड आहे; पण त्याबरोबरच आपल्या मातीशी जोडलेली नाळ विकासकामांसाठी वापरली तर निश्चितच ते सकारात्मक पाऊल असेल.
आदिवासी समाजात कितीतरी हुशार, बुद्धिमान मुलं-मुली आहेत; पण जेव्हा उच्च शिक्षणासाठी त्यांना शहरात जाण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्यासमोर फक्त आर्थिक अडचणी नसतात, तर भाषेच्या, राहणीमानाच्या, आत्मविश्वासाशी संबंधित, जीवनशैली, आहार, सवयी अशा अनेक समस्या त्यांना येऊ शकतात. तसंच शहरी विद्यार्थ्यांच्या वर्तुळात शिकण्यासाठी गेलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना इतरही वेगळे अनुभव येऊ शकतात, ज्यामुळे आत्मविश्वास आणखी कमी होऊन त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ शकतात. खरे तर अशा मुलांना शहरात स्थायिक झालेले शिकलेले आदिवासी बांधव खूप मोठा आधार ठरायला हवेत.
विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकाच्या युगातही आदिवासी समाज उपेक्षितच आहे. पायाभूत, मूलभूत सुविधांपासून कोसों दूर आहे. चांगले रस्ते, वीज, पिण्याचं शुद्ध पाणी, उच्चशिक्षण यापासून तो वंचित आहे. अनेक राजकीय नेते, सरकारी अधिकारी आदिवासी भागातले, कुटुंबातले असूनही त्यांनी पाहिजे तेवढा सजगपणा दाखवलेला दिसत नाही. तेवढी इच्छाशक्तीही त्यांच्यापाशी दिसत नाही. आदिवासीबहुल जिल्ह्यांत केंद्र व राज्य सरकारने स्वतंत्र असे आदिवासी विकास विभाग स्थापन केले आहेत. त्यांच्यामार्फत आदिवासी समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी कोट्यवधींची तरतूद केली जाते. पण सजग दृष्टी, गरजा आणि प्राधान्यक्रमाची सांगड घालण्याची क्षमता याच्या अभावामुळे एवढा निधी असूनही आदिवासी अनेक सुविधांपासून वंचित आहेत. असे का? हा प्रश्न विचारताना कोणीही दिसत नाही. दिवासींची संस्कृती जपत, ती अबाधित ठेवत नवीन जगाचंही ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे. विधायक उपक्रम राबवले पाहिजेत.
व्यसनमुक्त करणे, समस्या सोडवणे, शिक्षण, आरोग्य यावर काम करावे लागेल. ज्यांना शहरीकरणाचे वारे लागले, रोजगाराच्या, कार्यक्षेत्रातील वेगळ्या संधींमुळे गाव सोडले, त्यांनी तिथं जाऊन राहणं शक्य नसलं तरी आपापल्या भागांना भेटी देऊन तिथले प्रश्न समजून घेतले पाहिजेत. ते सोडवण्यासाठी आपल्या पातळीवर प्रयत्न करायला हवा. आदिवासी नेतृत्व खरंच आदिवासींचे प्रश्न सोडवत आहे का, हे तपासले पाहिजे. अनेकदा आदिवासी नेते आपल्याच लोकांचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक शोषण करताना दिसतात, त्यांना त्यापासून रोखायला हवे. उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनाही आपल्या गावच्या विकासाची दृष्टी दिली पाहिजे. लोकांच्या सेवेसाठी समर्पित होण्यासाठी प्रशिक्षित केले पाहिजे. त्यांनी त्यांच्या लोकांमध्ये शोषणाचा प्रतिकार करण्याचा आणि स्वतःच्या हक्कांचे रक्षण करण्याचा आंतरिक संकल्प विकसित करण्यास मदत केली पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या दलित वंचित समजातून पुढे आले त्या समाजाच्या उन्नतीसाठी बाबासाहेबांनी तहहयात परिश्रम घेतले. असेच बाबासाहेब आदिवासी तरुणांमधून निर्माण होण्याची मोठी गरज आहे ही गोष्ट आता आदिवासी पाड्यांकडे पाहिल्यावर लक्षात येते. सर्वसमावेशक व विधायक दृष्टी असलेल्या नेत्यांचा अभाव ही आपली मोठी समस्या आहे. अशा नेत्यांना जाब विचारण्याची क्षमता निर्माण ्होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शहरी प्रवाहात सामावताना, तिथली जीवनशैली अंगवळणी पाडताना गावाचा विसर पडतो. पण हेच लोक भाषा, संस्कृतीची माहिती असल्यानं हे लोक आपल्या गावांच्या विकासाला अधिक चांगल्या पद्धतीनं हातभार लावू शकतात. सामाजिक क्षेत्रातील उच्चशिक्षण घेतलेली सामाजित कार्यात झोकून देऊ इच्छिणारी मुलं, समाजभान असलेली संवेदनशील शहरी माणसं जर दुर्गम भागात जाऊन तेथे बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या त्या मातीतल्या लोकांना ते का शक्य नाही? त्यांनी आपल्या मातृभूमीच्या विकासाकडे संवेदनशीलतेनं पाहिल्यास नक्कीच चित्र बदलू शकते.
प्रमोद गोपाळराव गायकवाड, नाशिक
संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम
[email protected]
Mob – 9422769364
Educated Trible Youths and Students Remote Village Development