नाशिक – नाशिकरांच्या अनेक समस्या आहेत पण गेल्या पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी भाजपला शहराचा काहीही विकास करता आलेला नाही. नागरिकांना मूलभूत सुविधाही नीट देता आल्या नाहीत. नाशिककर सुज्ञ आहेत त्यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीत नागरिक योग्य तो निर्णय घेतील असे मत मनसे नेते दिलीप दातीर यांनी व्यक्त केले. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी मनसेच्या भूमिकेविषयी खास बातचीत करण्यात आली. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. बदललेल्या प्रभागरचनांविषयी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील सत्ताधाऱ्यांनी प्रभागरचनेची तोडफोड केली आहे. कोणताही प्रभाग कुठेही जोडला आहे. पण ही प्रभागरचना मनसेसाठी अनुकूल आहे. २०१२ ची पुनरावृत्ती होईल अशीच आमची तयारी आहे. यावेळी मनसेने केलेल्या बॉटनिकल गार्डन, उड्डाणपूल, रस्त्याची कामे, नाशिक पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुकणे धरणातून घेतलेली थेट पाइपलाइन, गोदा पार्क, शिवकालीन शस्त्रसंग्रहालय, नियोजनबद्ध आणि कोणतेही गालबोट न लागता झालेला कुंभमेळा अशा अनेक विकास कामांचा आढावा घेतला.
पण त्यानंतर तात्कालिक मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेण्याची साद घातली आणि चित्र पालटलं. लोकांची मानसिकता अशी असते की राज्यात ज्याची सत्ता आहे त्याची महापालिकेत असेल तर विकास होतो.पण याबाबतीत नाशिककरांची निराशा झाली. कोविड काळातही सत्ताधारी किंवा विरोधी कोणीही थेट नागरिकांच्या मदतीला रस्त्यावर उतरले नाही. त्यावेळी मनसे पदाधिकारी रस्त्यावर उतरून मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य, जेवण यांचं वाटप केले. हॉस्पिटल प्रशासनाने आकारलेली लाखो रुपयांची अव्वाच्या सव्वा बिल कमी करून देण्यासाठी मनसे नेते पुढे सरसावले. याकाळात राज्य शासनाने घोषणांचा पाऊस पाडला पण पालकमंत्री, राज्यसरकारने या कडे दुर्लक्ष केले, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
पक्षाच्या तयारीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, इच्छुक उमेदवार खूप आहेत. पण आरक्षण, कॅटेगरी यानुसार उमेदवारी दिली जाईल. तसेच सध्या विभाग आणि प्रभागरचनेनुसार दौरे चालू आहेत. पक्षसंघटनेवर आता भर आहे. प्रत्येक प्रभागानुसार शाखाध्यक्षांच्या नेमणुका केल्या आहेत. त्याचबरोबर जनता आणि राज ठाकरे यांच्यातील दुवा म्हणून ‘राजदूत’ या नेमणुकाही लवकरच करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या वेळी कोणासोबत लढणार की स्वतंत्र लढणार हा निर्णय सर्वस्वी राज साहेब घेतील पण सध्यातरी पूर्ण तयारीनिशी आम्ही सामोरे जाणार आहोत आणि नाशिककर योग्य तो निर्णय घेतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही संपूर्ण मुलाखत इंडिया दर्पण लाईव्ह फेसबुकवर बघा
https://fb.watch/b3jb6cuTTh/