मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या दसरा सणानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा सण साजरा करावा, सर्वांच्या जीवनात आनंदाचे क्षण यावे, अशी मानोकामना त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यपालांच्या शुभेच्छा
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, हा संदेश या सणाच्या माध्यमातून अधोरेखित होतो. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, आरोग्य व भरभराट घेऊन येवो या अपेक्षेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया – मुख्यमंत्री
विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा सण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘विजयादशमीचा हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी घेऊन येवो, त्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, विजयादशमी म्हणजे वाईटावर विजय मिळविल्याचा आनंदोत्सव. कोविडच्या बिकट संकटावर मात केल्यानंतर खऱ्य़ा अर्थानं आपल्या सर्वांसाठी हा आरोग्याचा विजयोत्सवच आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आता आपल्याला पुढे जायचे आहे. बलशाली महाराष्ट्र उभा करायचा आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रातील प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालावी, अशी आकांक्षा आहे. या विकास पर्वातूनच आपल्या सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल, असा विश्वास आहे. या ध्यासपूर्तीसाठी आपण एकजूट करुया या आवाहनासह पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमी – दसरा सणाच्या मनापासून शुभेच्छा!
चांगल्या प्रवृत्तीचे सृजन व्हावे – उपमुख्यमंत्री
विजयादशमीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीच्या पावन पर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि चांगल्या प्रवृत्तीचे सृजन व्हावे, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, विजयादशमी हा आपल्या संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण आहे. लोकभावनेला अभिव्यक्त करण्यात आपल्या सणांचे खूप मोठे योगदान आहे. विजयादशमी हा सण समाजातील चांगुलपणाचा, मांगल्याचा तसेच दुष्ट प्रवृत्ती आणि अवगुणावर विजय आहे. या पावन पर्वानिमित्त समाजात चैतन्याला उधाण येते. राज्यातील जनतेला सुख-समृद्धी लाभावी तसेच यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभावी.
Dasara Blessings by CM, DYCM and Governor