नाशिक : , किरकोळ कारणातील वादात धारदार शस्त्रांचा वापर होत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि.३) वेगवेगळया भागात महिलेसह तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. या घटनांमध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी भद्रकाली आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकुंतला नामदेव वाघ (४५ रा.साठफुटी रोड,गंजमाळ) या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री हॉटेल रॉयल हेरिटेज भागातील मोकळ््या जागी फिरोज उर्फ सोनू पप्पू शेख (२८),अल्ताप जावेद शेख (२९) व निखील विनोद कंडारे (२१ रा.सर्व पंचशिल नगर) हे वाघ यांचा पुतण्या व सुनेस मारहाण करीत होते. यावेळी त्या वाद मिटविण्यासाठी धावून गेल्या असता संशयीतांनी त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. या घटनेत त्यांच्या डाव्या हातावर एकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्या जखमी झाल्या असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तिघा संशयीतांना बेड्या ठोकल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत. दुसरी घटना देवळाली कॅम्प येथील जुने बसस्थानक भागात घडली. याप्रकरणी यश देविदास साळवे (१८ रा.शिंगवे बहुला ता.जि.नाशिक) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. साळवे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जुने बसस्टॅण्ड परिसरातील पुश्पविहार हॉटेल नजीकच्या सायबर कॅफे येथे कामानिमित्त गेला होता. संशयीत मनिष रवी यादव (रा.स्ट्रीट वखारी शेजारी दे.कॅम्प) याने त्यास गाठून मागील भांडणाची कुरापत काढली. यावेळी संतप्त संशयीताने शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत धारदार कोयता डोक्यात मारल्याने साळवे जखमी झाला असून अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.