विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या संकटाशी सामना करताना आगामी दोन ते तीन महिने देशाची परिस्थिती रूळावर येण्याची शक्यता नाहीये. देशात आगामी दोन ते तीन महिने लसीचा तुटवडा जाणवेल, असे जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी सांगितले. एका महिन्यात लसींचे १० कोटी डोसचे उत्पादन जुलैमध्येच होण्याची शक्यता आहे. आता एका महिन्यात सरासरी सहा ते सात कोटी लसींचे उत्पादन होत आहे, असेही ते म्हणाले.
अदार पुनावाला हे सध्या कुटुंबासोबत इंग्लंडमध्ये राहात आहेत. सरकारकडून लशींची ऑर्डर न मिळाल्यामुळे उत्पादन वाढविण्यात आलेले नाही. त्यामुळे जुलैपर्यंत लशींचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम देशात पाहायला मिळेल असे सरकारी यंत्रणेला लक्षात आले नव्हते. कोरोनाची दुसरी लाट इतकी भीतीदायक होईल हे कोणालाच लक्षात आले नाही. भारताने कोरोनाला मात दिली आहे अशी समजूत अनेकांनी करून घेतली होती. त्यामुळेच दरवर्षी सरासरी लशींचे १०० कोटींहून अधिक डोसचे उत्पादन करण्याचा विचार केला नव्हता, असे त्यांनी सांगितले.
सरकारवर निशाणा
लशींच्या १०० कोटी डोसच्या ऑर्डरनंतर नव्या डोसची ऑर्डर मिळालीच नाही. सरकार आणि अधिकार्यांना दुसर्या लाटेचा सुगावाच लागला नव्हता. केंद्र सरकारने लशींबाबत धोरण ठरविले आहे. आता राजकीय नेते लशीच्या संकटासाठी सीरम इन्स्टिट्यूटला जबाबदार ठरवत आहेत. भारताने लशीच्या निर्यातीवर बंदी आणल्यानंतर कंपनीने इतर देशांचे पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.
सरकारकडून तीन हजार कोटी
अदार पुनावाला म्हणाले, गेल्या महिन्यात सरकारने लशीच्या उत्पादनासाठी तसेच अॅडव्हान्स ऑर्डरसाठी तीन हजार कोटी रुपये दिले होते. आम्ही त्यावर कामही सुरू केले आहे. परंतु इतक्या जलद गतीने लशींचे उत्पादन करणे शक्य नाहीये.
एप्रिलपर्यंतचे लशींचे सर्व उत्पादन सरकारने खरेदी केले आहे. मेपासून राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना लस विक्री करायची आहे. यादरम्यान केंद्राने १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर देशात लस तुटवड्याचे संकट वाढू लागले. याच कारणामुळे १ मेस १८.३ लाख लोकांचेच लसीकरण होऊ शकले, अशी माहिती त्यांनी दिली.