इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– व्हिजन नाशिक – भाग १
नाशिकला व्हावा शक्ती, भक्ती आणि मुक्ती कॉरिडॉर
नमस्कार,
व्हिजन नाशिक या नव्या लेखमालेत आपणा सर्वांचे स्वागत. नाशिक हे वेगाने विकसित होत असले तरी आजही अनेक अडचणी आणि प्रश्न कायम आहेत. नाशिकचा विकास आपण कसा साधता येईल, याची माहिती आपण या लेखमालेत करुन घेणार आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या जगविख्यात असलेल्या नाशिकचा अद्यापही म्हणावा तसा अन्य स्वरुपाचा विकास झालेला नाही. रस्त्यांपासून अगदी साध्या कारणांसाठी सरकारकडे मागणी करावी लागते. नाशिकचा वेगाने विकास करायचा असेल तर आपण शक्ती, भक्ती आणि मुक्ती कॉरिडॉरची सरकारकडे मागणी करायला हवी. तो काय असेल, त्याचे फायदे काय, सरकारचे योगदान काय असेल याविषयी आपण आता जाणून घेऊया…
नाशिकच्या विकासासाठी वारंवार प्रयत्न करूनसुद्धा आपल्याया हवी असलेली रोड कनेक्टिव्हिटी मिळत नाही. मागील वीस वर्षांमध्ये कुठलीही नवीन आय.टी. कंपनी नाशिकमध्ये आलेली नाही. कुठल्याही प्रकारची विमानसेवा सुरु केली की वारंवार बंद करून इथली विमाने परराज्यांमध्ये वळविण्यात येतात. शंभर टक्के प्रतिसाद असताना सुद्धा विमान सेवा सतत बंद पडते. भारताचे वाईन कॅपिटल असलेल्या आपल्या नाशिक मधील वाईनारीला मिळणारे सर्व प्रकारचे अनुदान बंद करण्यात येतात.
नाशिकचा विकास आता करायचा तरी कसा? आपल्याला आलेल्या अनुभवांनुसार कुठल्याही पक्षाचे सरकार जरी आले तरी नाशिककडे ते दुर्लक्षच करतात. आणि याला कारण सुद्धा आहे, जर आपण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील दारिद्र्य बघितले तर आपल्या लक्षात येईल की नाशिक त्यापेक्षा कितीतरी जास्त समृद्ध आहे. त्यामुळे नाशिककडे दुर्लक्ष करण्यात येते. मुंबई-पुण्याला पर्याय नाही आणि तिथल्या राजकारण्यांकडे असलेली आक्रमकता आणि शहर विकासाचा ध्यास यामुळे मुंबई आणि पुण्याचा विकास होतो आहे. औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर सारख्या शहरांचा विकास होतो आहे. नागपूरचा तर अती-विकास होतोय. पण नाशिकचा विकास होत नाहीय. याचे मुख्य कारण म्हणजे सर्व पक्षांच्या सरकारचे असलेले ठाम मत की नाशिक अगोदरच समृद्ध आहे.
सरकारकडे आपण सारखे सारखे जाऊन नाशिकला उद्योगधंदे, रोड कनेक्टिव्हिटी, रेल्वे, एअर कनेक्टिव्हिटी द्या असे मागण्यापेक्षा आपण सरकारकडे एका वेगळ्या पद्धतीने प्रस्ताव दिले पाहिजे. नाशिक शहराचे महत्व काय आहे, नाशिकची गरज महाराष्ट्राला आणि देशाला तरी कशासाठी आहे हे समजावून देणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, नाशिकचे पौराणिक महत्व म्हणजे दर १२ वर्षांनी होणारा कुंभमेळा. नाशिक एक मोक्षधाम आहे. नाशिक एक शक्तिधाम आहे. नाशिक भक्तिधाम देखील आहे.
नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर सारखे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात महत्वाचे स्थान आहे. जेथे संपूर्ण भारतातून तसेच परदेशातून सुद्धा भाविक नारायण-नागबली, कालसर्प इत्यादी पूजा करण्यासाठी येतात. या पूजा केवळ येथेच होतात हे सुद्धा विशेष. नाशिकमध्ये रामकुंड येथे स्नान करण्यासाठी आणि तसेच हिंदू परंपरेनुसार आपल्या आप्तस्वकियांच्या मुक्तीसाठी आणि त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी सुद्धा भाविक जगभरातून येतात. कारण गंगा नदी इतकेच गोदावरीचे महत्व आहे. गोदावरीला दक्षिण गंगा असे देखील म्हणतात. नाशिककडे “सप्तशृंगी गड” सारखे एक महत्वाचे अर्ध-शक्तीपीठ आहे. तसेच भक्तीचे सर्वोच्च स्थान म्हणजे साईबाबा. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान “शिर्डी” देखील नाशिकच्या जवळ आहे. समृद्धी महमार्गवरुन विदर्भ आणि मुंबईहून येणाऱ्या भाविकांना या सर्व तीर्थस्थानांना जलद गतीने प्रवास करता यावा, त्याद्वारे पर्यटन आणि रोजगार निर्मिती व्हावी अशी योजना आपण आखली पाहिजे.
आपल्याकडे असलेल्या अशा भक्ती, मुक्ती आणि शक्ती स्थळांना जोडणारा एक “शक्ती, भक्ती आणि मुक्ती कॉरिडॉर”चा विकास करण्याचा प्रस्ताव आपण सरकारकडे देणे आवश्यक आहे. या सर्व महत्वपूर्ण स्थानांना एकमेकांशी जोडणारा सुपरस्पीड, हायस्पीड किंवा ४-६ लेन महामार्ग होणे अत्यंत आवश्यक आहे. या कॉरिडोरला खुप चांगला प्रतिसाद मिळेल याची जाणीव सरकारला असेलच. त्यामुळे सरकारला नवीन उत्पन मिळेल आणि या कॉरिडॉरचा परतावा काही वर्षात मिळू शकेल. या व्यतिरिक्त समृद्धी महामार्ग आणि सुरत-चेन्नई महामार्गाशी होणारी प्रस्तावित कनेक्टिव्हिटीमुळे महामार्गांचे उत्तम जाळे नाशिकला तयार होईल. नाशिकला कुठलीही आय.टी. किंवा सर्व्हिस इंडस्ट्री न येण्याचे कारण म्हणजे नाशिकची देशातील इतर महत्वपूर्ण शहरांशी नसलेली एयर-कनेक्टिव्हिटी आणि नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे महामार्गांची सध्याची अवस्था. जवळील कुठल्याही मोठ्या शहराबरोबर हायस्पीड कनेक्टिविटी नसल्याचा तोटा संपूर्ण शहराला होत आहे.
आपण सर्व नाशिकरांनी जर “शक्ती – भक्ती आणि मुक्ती कॉरिडॉर” विकास प्रस्तावावर काम केले आणि सरकारकडून मंजुरी घेतली तर नाशिक शहराच्या विकासाच्या इतर अपेक्षाही पूर्ण होतील. नाशिकचा विकास जलद गतीने निश्चित होईल, यात शंका नाही. अशा या कॉरिडॉरमुळे नाशिकला आउटर रिंगरोडचे जाळे तयार होईल. आपण लवकरच आपल्या खासदार आणि आमदारांसोबत ह्या विषयवार चर्चा करून एक आराखडा तयार करुन घेऊया. आपण सर्व वाचकांना जर का माझी ही संकल्पना आवडली असेल तर आपला अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेयर करा.
श्री पियूष सोमाणी (ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.)
Email ID: [email protected]
WhatsApp: 9011009700
Column Vision Nashik Shakti Bhatki Mukti Corridor by Piyush Somani
Development Religious Tourism