(पंच भूत स्थलम् – चौथे शिवमंदिर)
श्री कलाह्स्ती : वायूतत्त्वाचे शिवमंदिर!
पंचभूत स्थलम् या मालिकेतील चौथे शिवमंदिर असलेल्या श्री कलाहस्ती शिव मंदिराविषयी जाणू घेणार आहोत. हे शिवमंदिर वायूतत्वाचे आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. चला तर आज आपण वेळ न घालवता या मंदिराचे खालील लेखाद्वारे दर्शन घेऊया…
आंध्र प्रदेशात श्री कलाहस्ती हे गाव श्री कलाहस्ती या भगवान शिवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराला दक्षिणेचे कैलास किंवा दक्षिण काशी म्हणूनच ओळखले जाते. पंचमहा तत्वांनुसार जी प्रसिद्ध पाच मंदिरे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात आहेत. त्यातलं हे चौथे स्थान. वाऱ्याला किंवा हवेला तेलुगु भाषेत वायुवू तर तमिळ भाषेत कात्रू म्हणतात. पंच महाभूतात हवा किंवा वायू हे महत्वाचे तत्व. श्री कलाहस्ती येथे या वायू तत्वाचा प्रभाव असलेले शिवलिंग आहे. इतर चार तत्त्वापैकी मागच्या भागांत ‘इंडिया दर्पण’च्या वाचकांना माहिती दिलेले कांचीपुरम येथील एकाम्बरेश्वर मंदिरातील शिवलिंग ‘पृथ्वी’ तत्वा पासून निर्माण झाले आहे. थिरुवनैकलम येथील जम्बुकेश्वर मंदिरातील शिवलिंग’जल’तत्वा पासून निर्माण झाले आहे. आण्णामलैयार मंदिरातील शिवलिंग ”अग्नि” तत्वा पासून निर्माण झाले आहे. तर चिदम्बरम येथील थिल्लाई नटराज मंदिरातील लिंग ‘आकाश’ तत्वा पासून निर्माण झाले आहे.
श्रीकलाहस्ती मंदिर म्हणजे द्रविड शैलीतील वास्तूकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. पाचव्या शतकात पल्लव राजवटीत सर्व प्रथम हे मंदिर बांधले. या मंदिराचा परिसर एका पहाडावर वसलेला आहे. या मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार दक्षिण दिशेला आहे. तर मंदिर पश्चिमेला आहे. मदिरातील मुख्य शिवलिंग पांढऱ्या दगडापासून निर्मिलेले असून त्याचा आकार हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो.
बाराव्या शतकांत चोल राजघराण्यातील राजे राजेन्द्र चोल यांनी जीर्णोद्धार केलेले हे शिवमंदिर तिरुपतीपासून ३६ किमी अंतरावर आहे. येथील श्री कलाहस्तीश्वर मंदिरांत शिवलिंगाच्या रुपाने ‘वायू’ तत्त्वाची पूजा केली जाते. येथे राहू आणि केतू या ग्रहाचीही मंदिरं आहेत. सुवर्णमुक्ती नावाची नदी येथे या मंदिराजवळच उत्तर वाहिनी झाली आहे. वास्तूशास्त्राच्या आणि शिल्पकलेच्या दृष्टीने हे मंदिर एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. १२० फूट उंचीचा गोपूर हे या मंदिराचे प्रमुख आकर्षण म्हणता येईल. मंदिराची सुरुवातीची रचना पल्लव राज्यकर्त्यांनी केली. त्यानंतर आलेल्या चोल राज्यकर्त्यांनी तसेच विजयनगरच्या राजांनी देखील या मंदिराच्या विकासात मोठा सहभाग घेतला.
दक्षिणेतील इतर सर्व सुपर डुपर मंदिरांप्रमाणेच हे मंदिर बांधायला काही शतकं लागली. दहाव्या शतकांच्या सुमारास चोला राज्यकर्त्यांनी या मंदिराचे नुतनीकरण केले आणि हल्ली अस्तित्वात असलेले श्रीकलाहस्ती मंदिर त्यांच्याच कारकिर्दीत बांधून पूर्ण झाले. मंदिराभोवतीची भक्कम दगडी तटबंदी आणि त्यातून प्रवेश करण्यासाठी चार गोपुरं श्री वीर नरसिंहाराय यांनी बाराव्या शतकांत बांधली. ३७ मीटर म्हणजेच १२० फूट उंचीचे प्रमुख प्रवेशद्वार किंवा गोपुरं आणि १०० नक्षीदार दगडी खांबांचा विशाल सभामंडप विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांनी इ.स. १५१६ मध्ये बांधले. तर १९१२ साली एक लक्ष डॉलर्स खर्च करून देवकोट्टाई येथील श्री रामनाथन नत्तुकोत्ताई चेट्टीयार यांनी मंदिराला हल्लीचे स्वरूप मिळवून दिले. अप्पर, सुन्दरार आणि सांबथार सारख्या तमिळ संतांनी आपल्या तेवरम या काव्यातून या मंदिरातील देवतेचे गुणगान केले आहे.
अनेक आख्यायिका
या ठिकाणी भगवान शंकर कसे आले यांविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. शिवाच्या ६३ गणांपैकी कन्नप्पा नावाच्या शिव भक्ताने शंकराच्या पिंडीतून गळणारे अश्रू आणि रक्त पाहून आपला एक डोळा काढून पिंडीवर अर्पण केला. तरीही शिवाच्या पिंडीतून निघणारे अश्रू आणि रक्त थांबेना. तेव्हा त्याने दुसरा डोळाही शिवाला अर्पण करायचं ठरवलं. त्यासाठी तो तयार झाला पण त्याच वेळी भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते कायमस्वरूपी येथे राहू लागले.
या मंदिराविषयी आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. या विश्वाची निर्मिती झाली त्यावेळी भगवान वायूने कर्पुर लिंगमला प्रसन्न करण्यासाठी हजारो वर्षे तपश्चर्या केली. भगवान शिवाने वायूच्या तपश्चर्येवर प्रसन्न होउन त्याला तीन वर दिले. या वरामुळे वायू सर्वत्र सदैव उपस्थित राहू लागला. या ग्रहावरील प्रत्येक सजिवाला हवा किंवा प्राणवायू घेणे आवश्यक झाले. प्राणवायू हा प्रत्येक सजिवाच्या जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आणि शिव लिंगाला सांबशिव किंवा कर्पूर वायू लिंगमच्या रुपांत पुजले जाऊ लागले.
आणखी एक आख्यायिका अशी सांगितली जाते, त्यानुसार भगवान शंकरानी पार्वतीला शाप दिला. यामुळे भगवान शिवाला आपले दिव्य रूप सोडून मानव रूप घ्यावं लागलं. देवी पर्वतीने या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी श्री कलाहस्ती येथे अनेक वर्षे तपश्चर्या केली. पार्वतीची भक्ती आणि समर्पण पाहून प्रसन्न झालेल्या शिवाने पार्वतीला पुन्हा स्वर्गीय दैवी रूप प्राप्त करून दिले. तिलाच येथे ज्ञान ‘प्रसुनम्बिका देवी’ किंवा ‘शिव- ज्ञानम ज्ञान प्रसुनम्बा’ या नावाने ओळखतात.
श्री कलाह्स्ती मंदिर परिसरातील ९ फूट लांबीचे गणेश मंदिर एक अखंड शिळा कोरुन तयार केले आहे असे म्हणतात. येथे गणेशमन्म्बा, काशी विश्वनाथ, सूर्यनारायण, सुब्रमण्य, अन्नपूर्णा आणि शयदोगनपति यांचीही मंदिरं आहेत. ही मंदिरं गणपती, महालक्ष्मी गणपती, वल्लभ गणपती आणि सहस्त्रलिंगेश्वर यांच्या प्रतिमांनी सुसज्जित आहेत. मंदिर परिसरात ‘सादोगी मंडपम’ आणि ‘जलकोटी मंडपम’ आहेत. त्याचप्रमाणे चंद्र पुष्कर्णी आणि सूर्य पुष्कर्णी आहेत.
पूजाविधी
श्रीकलाह्स्ती मंदिराचे वार्षिक उत्पन्न १०० कोटी पेक्षा अधिक असून येथे प्रत्येक पूजेसाठी अधिकृत पावती दिली जाते. मंदिर अभिषेक सोमवार ते रविवार रु.६००/-, सुब्रत सेवा रू ५०/-, अर्चना रू २५/-, गोमाता पूजा रू ५०/-, सहस्त्र नामार्चन रू २००/-, त्रिसती अर्चना रू १२५/-, राहू केतु पूजा हे इथले वैशिष्ट्य आहे. सोमवार ते रविवार सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही पूजा केली जाते. रू. ५००/- कालसर्प निवारण पूजा मूल्य रू.७५०/- याशिवाय असीरचना राहू केतु कालसर्प निवारण पूजा रू. १५००/- आणि विशेष असीरचना राहू केतु कालसर्प निवारण पूजा रू. २५००/-येथे केली जाते.
रू.३००/- चे तिकिट काढलयास मंदिर परिसरातील एका मोठ्या हॉल मध्ये पूजा केली जाते. ७५०/-चे तिकीट काढल्यास मंदिर परिसरातील वातानुकूलित हॉल मध्ये पूजा केली जाते. तर रू. १५००/- चे व्हीआयपी तिकीट काढल्यास मंदिरच्या अन्तर्भागात पूजा केली जाते. या सर्व पूजा सामूहिक पद्धतीने केल्या जातात. श्रीकलाहस्ती मंदिरांत अन्य दैनिक सेवा देखील करता येतात. यात दररोज सकाळी १० वाजेनंतर ‘कल्याणोत्सव’ अभिषेक पूजा रू. ६००/- दर पोर्णिमेला ‘ऊजल सेवा’ करण्यासाठी रू. ५०००/- तर श्रीकलाह्स्ती मंदिरांत भाविकांनी सांगितलेल्या दिवशी ‘नंदी सेवा’ करता येते. त्यासाठी दर माणशी रू. ७५००/- मूल्य दिल्यास भाविकाने सांगितलेल्या दिवशी चांदीच्या नंदी व सिंहा वरुन श्री स्वामी आणि अम्मा वरलु यांची विशेष प्रदक्षिणा फेरी मंदिर परिसरात काढली जाते. या विशाल मंदिरांत वर्षभर काही ना काही कार्यक्रम महोत्सव साजरे केले जातात. सर्वांत मोठा उत्सव महाशिवरात्रीला असतो. त्यावेळी लाखंपेक्षा जास्त भाविक या मंदिरांत जमा होतात. येथे आपल्या त्र्यंबकेश्वर सारखा राहू केतू सर्प दोष निवारण पूजा हा विधि केला जातो.
दर्शनासाठी महत्वाच्या सूचना
१) मंदिरा बाहेर असलेल्या दुकानातून काहीही खरेदी करू नका. मंदिराचे अधिकृत तिकिट काढल्यावर मंदिरांत गेल्यावर पूजेचे सर्व आवश्यक साहित्य दिले जाते. या तिकीटाव्दारे मुख्य देवतेचे विशेष दर्शन घडविले जाते आणि विशेष पूजा देखील करता येते.
२) मंदिर परिसरातील पठान गणपती मंदिर अवश्य पहा.
३) गर्भगृहात असतांना तेथील पुजारी देवाच्या दर्शानासाठी किंवा इतर कशासाठी पैसे मागतील.अशा पुजर्यापासून सावध रहा.
४) काल सर्प निवारण पूजा किंवा ग्रहदोष निवारण पूजेसाठी आवश्यक ड्रेस कोडची काऊंटरवरच चौकशी करा. ही पूजा तमिल, तेलुगु, कन्नड, हिंदी, इंग्रजी भाषेत सांगितली जाते.
५) दर्शानासाठी पारंपरिक वेशभूषा करा.
संपर्क
श्रीकलाह्स्ती मंदिर आंध्रप्रदेश -517644. मोबाईल- 08578222240
(फोटो सौजन्य विकिपीडिया)