इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बदलायला हवा का?
ऑस्ट्रेलियातील टी२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाकडून सेमी फायनल मध्ये भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. ‘परंपरेप्रमाणे’ आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बदलावा, अशी मागणी हळूहळू जोर धरत आहे. ही मागणी योग्य आहे का, यासंदर्भात लिहित आहेत ज्येष्ठ क्रिडा समीक्षक जगदीश देवरे…
आपण प्रत्येक वेळी पराभवाचं खापर कुणाच्यातरी नावावर फोडत असतो. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया असून या मोठ्या स्पर्धेतील मोठ्या पराभवानंतर ही प्रतिक्रिया अपेक्षित देखील आहे. ज्याला क्रिकेटच्या चाहत्यांनीच रो’हिट’ असे टोपण नाव दिले आहे अशा रोहित शर्माची फलंदाजीतली वैयक्तिक कामगिरी देखील या ऐन नाजुक प्रसंगात ढासळलेली दिसत असल्याने कर्णधार बदलण्याच्या मागणीला आणखीच पाठबळ लाभते आहे.
कर्णधार बदलण्याची मागणी स्वाभाविक आहे. एक तर गेल्या काही दिवसापासून फक्त आणि फक्त या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने संघाची तयारी सुरू होती आणि या एका मोठ्या स्पर्धेसाठी भरभक्कम संघाची जडणघडण करण्याची जबाबदारी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचीच होती. विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाची तयारी व्हावी म्हणून प्रयत्न केले जात होते. परंतु प्रत्यक्षात या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संघ आल्यानंतर इंग्लंडकडून या संघाचा एकतर्फी पराभव व्हावा आणि विश्वचषक विजेतेपदाच्या उंबरठ्यावरून भारतीय संघाने माघारी फिरावं हे चाहत्यांच्या जिव्हारी लागलंय.
कर्णधार म्हणून रोहित शर्मा अपयशी ठरतो आहे का? या प्रश्नाचे उत्तर अगदी होकारार्थी देणं जितकं सोपं नाही तितकंच नकारार्थी देणं देखील सोपं नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एक चांगली कामगिरी केलेली आहे अशी आकडेवारी सांगते. परंतु ज्या मोठ्या स्पर्धा असतात तिथे मात्र भारतीय संघाची पीछेहाट होते हा अनुभव देखील आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माच्या ताब्यातून कर्णधार पद काढून घेणे, हे या संघासाठी औषधोपचार ठरेल का? या दृष्टीने देखील विचार झाला पाहिजे. केवळ कर्णधार बदलला म्हणून नशीब बदलेल आसे नाही. मुळात भारतीय संघाची फलंदाजी ही जरी मजबूत असली तरी गोलंदाजी मात्र तितकीच कमकुवत आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. इंग्लंड विरुध्दच्या पराभवाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आपण दरवर्षी आयपीएल भरवतो. याखेरीज संघाला भरगच्च वेळापत्रक असलेले आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतात. या सगळ्या कसरतीत भारतीय खेळाडूंचा व खास करून गोलंदाजांचा फिटनेस हा ऐरणीवरचा प्रश्न राहिलेला आहे. या परिस्थितीत एखाद्या कर्णधाराकडून खूप अपेक्षा बाळगणे गैर आहे. खास करून या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्णधाराच्या हातात असंतुलित संघ देऊन त्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा करणे आणि तो चमत्कार घडला नाही म्हणून पराभवाचे खापर त्याच्यावर फोडणे हे देखील अप्रूप वाटत नाही.
टी२० साठी कर्णधार बदलायचा का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी जरी मानले तरी त्याला केवळ विश्वचषकातील पराभवाचा संदर्भ देवून चालणार नाही. रोहित शर्माला पर्यायी कर्णधार भारतीय संघात उपलब्ध आहे का याचाही विचार होणे आवश्यक आहे. या जागेसाठी सलामीवीर के.ल. राहुल याचा विचार होऊ शकला असता. परंतु एका बाजूला त्याच्या सुमार परफॉर्मन्समुळे संघातील त्याचेच स्थान डळमळीत झालेले दिसत असल्याने त्याची कर्णधारपदी नियुक्ती होणे अशा परिस्थितीत अशक्य वाटते आहे. ‘हार्दिक पांड्या’ आणि ‘वृषभ पंत’ या इतर दोघांच्या नावाचा विचार कर्णधार पदासाठी केला जाऊ शकतो.
२०२२ च्या आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा संघ हा हार्दिक पांड्याचा संघ होता आणि त्यामुळे विजेत्या संघाच्या कर्णधारपदाचा एक दांडगा अनुभव पांड्याकडे आहे. शिवाय आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध आणि विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध, हार्दिक पांड्याने संघ संकटात असताना उत्तम कामगिरी करुन दाखविलेली असल्याने हार्दिक पांड्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यासाठी सबळ कारणे आहेत. यष्टीरक्षक वृषभ पंत या नावाचा देखील विचार टी२० चा भावी कर्णधार म्हणून केला जाऊ शकतो. परंतु ज्याला मॅच फिनिशर म्हणतात, असा दिनेश कार्तिक संघात असेपर्यंत वृषभचेच संघातील स्थान डळमळीत असल्याने कदाचित वृषभच्या नावाचा विचार सध्यातरी टाळला जाऊ शकेल.
आता पुन्हा पुढच्या विश्वचषकाची आव्हाने पेलण्यासाठी संघाला नव्या जोमाने कामाला लागावे लागेल. त्यासाठी एक लॉन्ग टर्म प्लॅन म्हणून संघाची जडणघडण सुरू करावी लागेल. यात कर्णधाराचा बदल हा अपरिहार्य राहील हे निश्चित. परंतु त्यासाठीची योग्य वेळ पाळावी लागेल..
Column Pavilion Indian Cricket Team Captain Change by Jagdish Deore