इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलियन –
भारतीय पहिलवान आता खेळणार ‘टी२० विश्वचषक’
आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी जर आशिया चषक स्पर्धा ही एक पुर्वपरीक्षा होती असे मानले, तर या पुर्वपरीक्षेत भारतीय संघातले सगळेच पहिलवान नापास झाले असून या पार्श्वभूमीवर आगामी विश्वचषक स्पर्धेत मोठ्या सन्मानाने आणि मोठ्या ताकदीने खेळणे हे भारतीय संघाला जड जाणार आहे हे नक्की. त्यामुळे या फॉरमॅटच्या विश्वचषक स्पर्धेत जर भारतीय चाहते या संघाकडून फार मोठी अपेक्षा बाळगून असतील तर मग नंतरचा भ्रमनिरास टाळण्यासाठी त्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. आगामी विश्वचषक आणि भारतीय संघ यासंदर्भात परखड विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…..
खरंतर भारतीय संघाचा दर्जा पाहता आशिया चषक स्पर्धेत एकट्या पाकिस्तानशी असलेला मुकाबला सोडला तर भारतासाठी पुढचा प्रवास फार अवघड नव्हताच. परंतु पहिल्या सामन्यातील पाकिस्तान विरुद्धचा अपवादात्मक विजय वगळला तर नंतर सगळ्याच लढती या संघाला जड गेल्या. म्हणजे हाँगकाँग सारख्या संघाविरुद्ध भारतीय संघाने सामना जिंकला हे जरी खरे असले तरी विजयाचा तो प्रवास इतका विनासायास नव्हता तितका तो पाकिस्तानने साध्य केला हे विसरून चालणार नाही. मग नंतर दुस-या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध पराभव झाल्यावर जणू काही सगळं संपलं, अशा अविर्भावात आमचा संघ श्रीलंकेविरुद्ध हरला आणि नंतर आम्ही अफगाणिस्तान विरुद्ध एक मोठा विजय मिळवतांना, वेळ निघून गेली रे बाबांनो हे म्हणण्याची चाहत्यांवर वेळ आली.
ही कामगिरी आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी एक धोक्याची घंटा आहे असे म्हणण्याचे कारण तितकेच मजबूत, तितकेच महत्त्वाचे आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीन मुख्य खांबावर ज क्रिकेटची पाळमुळं उभी असतात त्या तीनही आघाड्यांवर भारतीय संघाची कामगिरी सपशेल अपयशी ठरत गेली आणि त्याला जोड मिळाली ती रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्या फसत गेलेल्या डावपेचांची. त्यामुळे एखाद्या मोठ्या स्पर्धेआधी जर सुधारणा करायची असेल तर जो वेळ लागतो तो पुरेसा उपलब्ध नसल्याने आता चमत्कारावर सारं काही अवलंबून राहील.
त्या प्लॅटफॉर्मवर जे ग्रुप्स आहेत त्यात साखळीत भारतीय संघाला पाकिस्तान, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रीका या बलाढ्य सघांसोबत सामना करायचा आहे आणि मग ही अग्नीपरीक्षा पुढे इतर बलाढ्य संघांसमोर पुर्ण करायची आहे. आमच्या फलंदाजीची लाईन अप फार मोठी आहे. एक एक फलंदाज पहिलवान आहे. परंतु, हे पहिलवान मोक्याच्या क्षणी कसे ‘फेल’ होतात याचा अनुभव आशिया चषकात आलाच आहे. के.एल.राहूलच्या बिग बजेट अपयशानंतर सलामीचा प्रश्न उभा आहेच. कर्णधार रोहीतने धावा केल्या पण टी२० फॉरमॅटमध्ये त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या आहेत.
विराट कोहलीला फॉर्म गवसलाय ही एक जमेची बाजू, पण जमेचीच रहावी अशी प्रार्थना करावी लागेल. रविंद्र जाडेचा संघात नाही म्हटल्यानंतर नुसती फलंदाजीचा कणा मोडत नाही तर गोलंदाजी देखील एखाद्या पडक्या घरासारखी वाटायला लागते. क्षेत्ररक्षणाचं तर विचारूच नका, जाडेजा शिवाय एकाचा जरी डायरेक्ट थ्रो आता बघायला मिळाला तर कुणालाही आकाशात तुटून पडलेल्या चांदणीकडे बघितल्याचा आनंद मिळेल अशी आमची गत आहे. टी२० मध्ये शेवटचा फलंदाज सुध्दा भरवशाचा वाटावा लागतो. पण आपल्या संघात ‘ती’ सुविधा अनादी अनंत काळापासून उपलब्ध नाही.
जे फलंदाजीत तेच गोलंदाजीत, किंबहून त्यापेक्षा जास्तच वाईट परिस्थिती बघायला मिळते. जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर, अर्शदीप हे संघात असतील ही जरी एक मोठी आशा असली तरी खास करून १९ आणि २० षटक टाकण्यासाठी गोलंदाज निवडतांना रोहीत शर्मा कडून होणारी चूक आता सुधरेल अशी अपेक्षा करू या. रविचंद्रन अश्चिन हा संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून घेतला जातोय पण तो जर केवळ ‘डग आउट’ मध्ये बसण्यासाठी नेला जाणार असेल काय उपयोग? महेंद्रसिंग धोनी नंतर रोहीत शर्माची ओळख ‘मिस्टर कूल’ अशी व्हायला लागली होती. परंतु, आशिया चषक स्पर्धेत ती सगळीच पुसली गेली. विकेट मिळत नसेल तर धोनी संघातल्या एखाद्या अनऑर्थाडॉक्स गोलंदाजावर भरवसा ठेवायचा. हा फॉर्म्युला कित्येकदा यशस्वी देखील ठरल्याची उदाहरणे आहेत. परंतु हा जिगरा दाखवायची हिम्मत नंतर कुणीच केलेली नाही.
विश्वचषकापुर्वी २०, २३ आणि २५ सप्टेंबरला ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर २८ सप्टेंबर आणि १, ३, ६ आणि ९ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रीका संघाबरोबर भारतीय संघाच्या लढती आहेत. या दोन मालिका विश्वचषकासाठी किती उपयुक्त ठरतील यात शंकाच आहे कारण या दोन्ही मालीका भारतीय मैदानावर खेळल्या जाणार आहेत. मात्र २३ ऑक्टोबरला जेव्हा विश्वचषक मोहीमेत भारतीय संघाचा पहिला सामना आहे तो पाकिस्तानशी आणि तो देखील ऑस्ट्रेलियातल्या मेनबोर्न क्रिकेट मैदानावर. ही आख्खीम मोहीम वाटते तितकी साधी नाही ते यासाठीच.
Column Pavilion Indian Cricket Team and T20 World Cup By Jagdish Deore