धावपटू रिंकी पावरा आणि पल्लवी जगदाळे
सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊतच्या रुपाने आपल्याला आदिवासी आणि दुर्गम भागातील हिरा गवसला. आता त्याच पद्धतीने दोन तारे चमकताना दिसत आहेत. ते म्हणजे धावपटू रिंकी पावरा आणि पल्लवी जगदाळे…

लेखक हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.
मो. 9422770532
प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात १९९२ पासून नाशिक येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) ऍथलेटिकचे केंद्र सुरु झाले. तेव्हापासून नाशिकचे नाव एकदम राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजू लागले आहे. ऑलिम्पिअन कविता राऊत, जागतिक ऍथलेटिक स्पर्धेत उतरलेली मोनिका आथरे आणि आता आशियाई स्पर्धेत पदक मिळविणारी संजीवनी जाधव या अगदी प्रमुख खेळाडू. पण या व्यतिरिक्त इतर किमान ५०० मुले आणि मुली वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाव कमवित आहेतच. यातीलच सध्या उत्तम कामगिरी करणाऱ्या आणि नाशिक साई केंद्राचा लौकिक वाढविणाऱ्या दोन नवीन ताज्या दमाच्या मुली आहेत रिंकी पावरा आणि पल्लवी जगदाळे.
पल्लवी आहे पंढरपूरची तर रिंकी नंदुरबारच्या आदिवासी पट्ट्यातील. दोन्ही मुली राज्य आणि शालेय धावण्याच्या स्पर्धेत त्यांच्या शाळांकड़ून उतरल्या. त्यांच्यातील चमक विजेंद्र सिंग यांच्या नजरेने हेरली. साधारण तीन वर्षांपूर्वी सरांनी दोघींच्या घरच्यांची मनधरणी करून आणि मुलींची पूर्ण जबाबदारी घेऊन नाशिक ऍथलेटिक केंद्रात आणल्या. तथापि कोरोनामुळे त्या केंद्रात दीड वर्षांपासून राहताहेत.
“या दोघींमध्ये उत्तम एन्ड्युरन्स आणि स्टॅमिना आहे. हे मी जाणले कारण त्या दुर्गम भागात राहिलेल्या आहेत. किरकोळ गोष्ट आणायलाही त्यांना ५-६ मैल पळत आणि डोंगर पार करीत जावे लागते. त्यामुळे त्या लांब पल्ल्याच्या स्पर्धेसाठी म्हणजे ३०००मीटरसाठी एकदम योग्य वाटल्या. त्यांच्या तंत्रात थोडी सुधारणा केली. थोडे फिनिशिंग टचेस दिले. आज त्या राष्ट्रीय पातळीवर ३०००मीटर स्टीपलचेस आणि ३००० मीटर फ्लॅट धावण्यात अव्वल क्रमांकावर आहेत.”, असे विजेंद्र सिंग सांगतात.
अलिकडेच पतियाळा येथे झालेल्या राष्ट्रीय वयोगट स्पर्धेत ३००० मीटर मध्ये पल्लवी तर ३००० मीटर फ्लॅट मध्ये विक्रमी वेव्हेल नोंदवून विजेत्या झाल्या आहेत. वाढते वय असल्याने त्यांच्यात अजून खूप सुधारणा होऊ शकते. (रिंकी १७ तर पल्लवी १८ वर्षे). शरीराची पूर्ण वाढ झाल्यावर त्या ५००० मीटर, १०००० मीटर अर्ध (२१ किलोमीटर) आणि पूर्ण मॅरेथॉनसाठी देखील आपले कसब आणि कौशल्य दाखवू शकतील. तसा विश्वास सिंग व्यक्त करतात. मोठ्या गटात ३००० मीटर फ्लॅट ही स्पर्धा नसल्याने रिंकी ५००० किंवा १०००० मध्ये नक्कीच शिफ्ट होऊन तेथेही महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव गाजवेल. तर पल्लवी ३००० मीटर स्टीपलचेस हा ऑलिम्पिक इव्हेंट असल्याने त्या मध्येच अधिक कौशल्य आत्मसात करून नाव कमावू शकते.
दोघींची वाटचाल त्यादृष्टीने निश्चितपणे चालू आहे. विजेंद्र सिंग सरांच्या निष्णात मार्गदर्शनाने ते शक्य आहे. अशी यशस्वी कारकीर्द घडविण्यात विजेंद्र सिंग सरांचा प्रमुख वाटा आहेच. पण त्यांना सर्व सुविधायुक्त जागा उपलब्ध करून देणारे भोसला मिलिटरी स्कूल, विभागीय क्रीडा संकुल येथील मैदान हवे तेव्हा उपलब्ध करून देणारे सरकारी अधिकारी, तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसह इतर अनेक खेळप्रेमी प्रायोजक यांचाही तितकाच वाटा आहे. त्याच्या जोरावरच हे दोन्ही हिरे येत्या काळात लकाकताना आपल्यााला दिसू शकणार आहेत.